| पाली । वार्ताहर ।
पाली गरोदर मातांनी आपल्या आरोग्यकडे लक्ष देणे गरजेचेअसल्याचे प्रतिपादन वर्हाड – जांभुळपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रद्धा कानडे यांनी केले. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, माता व बालकांचा मृत्युदर कमी करुन सुरक्षित मातृत्वाला प्राधान्य देणे ही आपली प्रमुख जबाबदारी आहे. दरम्यान गरोदर मातांनी दैनंदिन आहारात लोहयुक्त अन्नपदार्थांचा वापर योग्य प्रमाणात करावा. गरोदर व स्तनदा मातांनी नियमित तपासणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
पोषण आहार सप्ताह अंतर्गत वर्हाड – जांभुळपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने व एकात्मिक बालविकास प्रकल्प सुधागड – पाली यांच्या सहकार्याने जांभूळपाडा बीट मधील गरोदर मातांच्या ओटी भरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात मोठ्या संख्येनी महिलांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी पोषण आहार पंधरवड्यानिमित्त गरोदर मातांना चांगले आरोग्य राखण्याचे धडे उपस्थितीत मान्यवरांनी दिले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच , उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, रुग्णालयातील परिचारिका, अंगणवाडी सेविका, आशा, गटप्रवर्तक, महिला व बालविकास विभागाचे कर्मचारी तसेच आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी उपस्थित होते.