मेरीटाईमकडून रो-रो जेट्टीचा घाट

विरोध डावलून काम सुरू, मच्छिमार आक्रमक
चार हजार कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती

| चिरनेर | वार्ताहर |
मोरा भाऊचा धक्कादरम्यान 75 कोटी खर्चाच्या रो रो सेवेच्या कामाला सुरुवात करताना येथील स्थानिक मच्छिमारांना कोणत्याही प्रकारे विचारात घेतलेले नाही. या कामामुळे येथील शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त होणार असल्याने संतप्त झालेल्या स्थानिक मच्छिमारांनी रो रोच्या कामाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, विविध मागण्यांच्या समस्यांची सोडवणूक होईपर्यंत रो रो सेवेचे काम बंद करण्यात यावे, असा निर्णय मंगळवार, दि.20 रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मोरा भाऊचा धक्कादरम्यान 75 कोटी खर्चाच्या रो रो सेवेच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, रो रो सेवेचे काम सुरू करताना येथील स्थानिक मच्छिमारांना कोणत्याही प्रकारे विचारात घेतलेले नाही. या मोरा बंदरातून स्थानिक मच्छिमारांच्या सुमारे 300 नौका मासेमारी व्यवसाय करीत आहेत. या मसेमारी व्यवसायावरच 4000 स्थानिक मच्छिमार कुटुंबे आपला उदारनिर्वाह करीत आहेत. या कामामुळे स्थानिक मच्छिमार बाधित होणार आहेत. तर, काही राहती घरेदेखील बाधित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मच्छिमारांच्या समस्या समजून न घेताच आणि त्यांना अंधारात ठेवून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने मोरा भाऊचा धक्का रो रो सेवेचा घाट घातला आहे.

मोराबंदर, मोरा कोळीवाडा येथील स्थानिक मच्छिमारांना विचारात न घेता, रो रो जेटीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे संतप्त मच्छिमारांनी मंगळवारी बैठकीचे आयोजन केले होते. पुनर्वसन, पुनर्वस्थापना करण्याच्या अनुषंगाने कोळी समाजाच्या न्याय्य हक्क व विविध मागण्यांसाठी येथील एकविरा देवीच्या मंदिरात मोरा कोळीवाडा ग्राम विकास समितीच्या माध्यमातून बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला ओबीसी नेते राजाराम पाटील, अध्यक्ष प्रशांत कोळी, उपाध्यक्ष हेमंत कोळी, सचिव सुहास कोळी, सहसचिव सुनील कोळी, खजिनदार शेखर कोळी, सहखजिनदार नंदादीप कोळी, रवींद्र चव्हाण तसेच अन्य सदस्य उपस्थित होते. रो रो जेटीच्या कामाला विरोध दर्शवीत 2013च्या कायद्यातील तरतुदी धाब्यावर बसून काम सुरू करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला. या सर्व मागण्यांसाठी न्यायालयीन लढा देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Exit mobile version