। पुणे । प्रतिनिधी ।
राज्यात सत्ता न आल्याने आम्ही खूप अस्वस्थ होतो. त्यामुळे आम्ही अडीच वर्षापूर्वीच शिवसेना फोडण्याचे प्लॅनिंग केले असल्याचा असा गौप्यस्फोट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मात्र शिंदे गटाने त्यांचा हा दावा फेटाळून लावत आम्ही उठाव केल्याचे म्हटले आहे.
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी दोन-अडीच वर्षांपासून आपलं सरकार येईल असे सांगत होतो, हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा होता. 40 जणांना बाहेर काढणे सोपे नव्हते. त्यासाठी वेळ लागणार होता. त्यासोबत तशी संधी येणेही महत्त्वाचे होते. शेवटी ती वेळ साधली गेली आणि आपले सरकार आणले, असा खुलासा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
शिंदे गटाचा इन्कार
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या दाव्याचा शिंदे गटाने इन्कार केला आहे. गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आमचा असा काही प्लॅन नव्हता. आमचा उत्स्फूर्त असा उठाव होत. तो काही तत्वांसाठी. असे त्यांनी सुचित केले.