योजना पूर्ण झाली, मात्र विहीर कोरडीठाक; नागरिकांच्या घशाला कोरड
| रायगड | आविष्कार देसाई |
जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य संपवण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. पनवेल तालुक्यातील शांतीवन गावात प्रशासनाने विहीर खोदली आहे. यासाठी 1 कोटी 39 लाख 76 हजार 139 रुपये खर्च केले आहेत. मात्र, विहिरीला पाणीच न लागल्याने ती कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे प्रशासनाने योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ती कागदावर रंगवली आणि ठेकेदाराची धन केली का, असा प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. परिणामी, पाणी नसल्याने नागरिकांचे पाण्यावाचून चांगलेच हाल होत आहेत.
जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शांतीवनसारख्या विहिरी आहेत. त्याचा एक अहवाल तयार करावा, जेणेकरुन प्रशासनाने किती कोटी रुपये पाण्यात घातले, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. यासाठी लवकरच रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्याकडे लेखी मागणी करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी ‘कृषीवल’शी बोलताना सांगितले.
जलजीवन मिशन अतंगर्त शांतीवन/हिंदुस्थान नळ पाणीपुरवठा योजना असे या योजनेचे नाव आहे. रायगड जिल्हा परिषदेने यासाठी सुमारे एक कोटी 39 लाख 76 हजार 139 रुपये खर्च केले आहेत. कार्यारंभ आदेश 26 ऑक्टोबर 2023 रोजी दिले होते. 20 मार्च 2024 रोजी योजना पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र, अद्यापही योजना पूर्ण करुन आमच्या स्वाधीन केलेली नाही, असे पनवेल येथील अॅड. प्रमोद ठाकूर यांनी ‘कृषीवल’ला सांगितले. योजना पूर्ण केली, पण विहिरीला पाणीच लागले नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये वाया गेले आहेत. कार्यकारी अभियंता संजय वेंर्गुलेकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना याची माहिती दिली आहे. त्यांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार असे सांगितले होते. आता या गोष्टीला 20 दिवस लोटले आहेत, असेही अॅड. ठाकूर यांनी स्पष्ट केले. या ठिकाणी पाणी लागणारच नव्हते तर, मग भूजल सर्वेक्षण विभाग काय करत होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आता समाधानकारक पाऊस पडला तरच सदरच्या विहिरीत पाणी साठणार आहे. पुढील कालावधीत हा पाणीसाठा किती दिवस पुरणार, हादेखील प्रश्नच आहे. दरम्यान, कार्यकारी अभियंता संजय वेर्गुलेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.