शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कळंब येथे विद्यार्थ्यांच्या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. कळंब ग्रामपंचायत आणि सीएमसीए या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिली अनोखी ग्रामसभा शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत झाली. या विशेष ग्रामसभेत विद्यार्थ्यांनी शिक्षण, पाणी व स्वच्छता, सुरक्षितता, आरोग्य, गाव विकासाबद्दलचे प्रश्न उपस्थित केले.
कळंब येथील दत्त मंदिराच्या सभा मंडपात आयोजित या मुलांच्या ग्रामसभेचे आयोजन केले होते. त्यावेळी कळंब ग्रामपंचायत सरपंच माधुरी बदे, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया कृष्णमूर्ती, विनोदिनी लुल्ला, महिला पोलीस निरीक्षक माधुरी मुळीक, कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी योगेश पाटील, वरिष्ठ अधिकारी प्रिया नबियार, प्रीता देशमुख, कोकण शिक्षण संस्थचें मुख्याध्यापक सुभाष देशमुख, चौधरी, परिजाडे दामियात, ग्रामसेवक बुरुड, नीता गाडगे आदी उपस्थित होते.
महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी आपल्या मुलांनी मोबाइलचा अतिरिक्त वापर टाळला पाहिजे, कारण सायबर गुन्ह्यापासून लांब राहून करिअर घडवण्याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर, मुलाच्या सुरक्षेसाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 व मुलीच्या एकंदरीत सुरक्षेसाठी 112 ही हेल्पलाईन वापरण्याचे आवाहन केले. यावेळी गाव प्रेरक म्हणून सुवर्णा कोरडे व निखिल चोंडकर यांनी काम केले, तर कळंब परिसरातील सुमारे 250 शालेय विद्यार्थी उपस्थित होते.