। मुंबई । प्रतिनिधी ।
रायगडातील सर्वच नद्यांचे प्रदुषण होत असल्याची कबुली सरकारने दिलेली आहे. याबाबतचा प्रश्न शेकापचे आ. जयंत पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी लेखी उत्तरात सांगितले की, रासायनिक वसाहतीमधील उद्योगांचे सांडपाणी नदीमध्ये सोडले जात नाही. तथापि, नदी परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निर्माण होणारे घरगुती सांडपाणी नदीमध्ये मिसळते. त्यामुळे प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रदुषण मंडळामार्फत उद्योगांनी सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा बसविल्याशिवाय उद्योग सुरु करण्यास परवानगी देण्यात येत नाही. सांडपाण्यावर मानकानुसार प्रक्रिया व विल्हेवाट न करणार्या उद्योगांना वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस, प्रस्तावित निर्देश तसेच बंदीचे आदेश बजावण्यात आले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आ. जयंत पाटील यांनी महाड, रोहा, नागोठणे, रसायनी या रासायनिक वसाहतींमधील सांडपाणी नद्यांसाठी घातक ठरत आहे.औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यावर अनेकदा योग्य प्रक्रिया न करताच ते नदीत सोडले जात असल्यामुळे नद्या प्रदूषित होतात, असे म्हटले होते. प्रदूषित सांडपाणी नदीत सोडताना त्या पाण्याची गुणवत्ता तपासणे तसेच सांडपाण्यातील एमओडी आणि सिओडी यांची मानके तपासणे गरजेचे असतानाही कारखान्याकडून ते तपासले जात नाही.
औद्योगिक वसाहतींची उभारणी करताना नद्यांच्या प्रदुषणाचा विचार करण्यात आला नाही. तसेच रासायनिक कंपन्या प्रदूषित सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते सांडपाणी नद्यांमध्ये सोडत असून प्रदूषित सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यापूर्वीच नद्या प्रदूषित झाल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला.