| वाघ्रण | प्रतिनिधी |
पावसाच्या पहिल्याच आठवड्यात अलिबाग तालुक्यातील वाघ्रण-वाघोली मार्गे तिनविरा रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. हा चार किलोमीटर लांबीचा रस्ता असून, जागोजागी खड्डे पडलेले आहेत. आता ते पाण्याने भरल्याने या मार्गावर प्रवास करणे कठीण झाले आहे. अरूंद रस्ता आणि खड्डे यामुळे अपघात होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. त्यामुळे प्रवासी वर्गातून लोकप्रतिनिधी व संबधीत विभागावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या आधी हा रस्ता अनेकदा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून दुरुस्त करण्यात आला आहे. परंतु, यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी स्थानिक लोक प्रतिनिधी आणि संबंधित विभागाकडून दुर्लक्ष झाले आहे. या मार्गाकडे लक्ष न दिल्यास भविष्यात या मार्गावरील स्थानिकांना कार्लेखिंड किंवा जलपाडा मार्गे एमआयडीसी-पेझारी चेकपोस्ट असा प्रवास करावा लागेल. परंतु, हा प्रवास आणखी महागडा होईल. त्यामुळे संबंधित विभागाने कडे लक्ष देण्याची गरज असल्याचे स्थानिकांमधून आणि प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.







