एमएसआरडीसीचा अनागोंदी कारभार
लताताई कळंबे यांचा आमरण उपोषणाचा इशारा
पाली/बेणसे | वार्ताहर |
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गाची मागील अनेक वर्षांपासून झालेली दुरवस्था व चाललेला अनागोंदी कारभार, तसेच वारंवार होणार्या अपघातात जाणारे निष्पाप जीवांचे बळी याबाबत जनमानसात प्रचंड संताप आहे. सदर राज्यमहामार्ग सुस्थितीत यावा, प्रवासी जनतेचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा, जखमी व मयत अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई मिळावी या मागणीसाठी मनसेच्या महिला रायगड जिल्हा सचिव तथा सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी एमएसआरडीसी प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दि. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीदिनी मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या दालनासमोर श्रीमती कळंबे आमरण उपोषणास बसणार आहेत. यासंदर्भात एमएसआरडीसी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. खापोली-पाली-वाकण या रस्त्याची अवस्था गेली तीन वर्षे अतिशय भयवाह आहे.
या मार्गावरील अपघातात अनेक जणांना अपंगत्वदेखरल पत्करावे लागले आहे. पण, या महामार्गाला कोणीच वाली नाही, महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी असून, नक्की ठेकेदार कोण? कोणाच्या अखत्यारीत हे काम चालू आहे? याचा अद्याप कोणालाच उलगडा झालेला नाही. दरम्यान, राज्य महामार्गावर अपघातात मृत व्यक्तीच्या नातेवाईक व अपघातग्रस्त आदिवासी तरुणांना काय नुकसान भरपाई देणार आहात यासंदर्भात चर्चा करण्यासाठी अधीक्षक अभियंता यांनी स्वतः पालीवासियांसमक्ष हजर राहावे आणि जर तुम्ही पाली येथे हजर राहून लोकांशी संवाद साधण्यास असमर्थ ठरलात, तर महात्मा गांधी जयंतीदिनी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा लता कळंबे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.