खड्ड्यांमुळे वाहनांची होतेय नादुरुस्ती
वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण
गोवे-कोलाड | वार्ताहर |
लोक म्हणतात ऐका सत्यनारायणाची कथा, मात्र आपल्या देशात आणि राज्यात बघा मुंबई-गोवा महामार्गाची कथा एक ना धड भराभर चिंध्या अशी अवस्था या मार्गाची झाली आहे. भयानक पडलेल्या खड्ड्यांमुळे आता सर्व वाहनचालक मालक आणि प्रवासी नागरिकांना प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले असून, जणू प्रवाशांच्या मृत्यूचा खेळखंडोबा आहे, अशी वेळ येऊन ठेपली आहे, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात आता बारा सुगरणी आणि भोपळा झाला आळणी, ही पारंपरिक म्हण योग्य आहे, असे म्हणणे काही हरकत नसल्याचे या महामार्गाच्या परिस्थितीवरून लक्षात येत आहे, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाची परिस्थिती दिवसेंदिवस अति गंभीर झाली असून, याबाबत कोणाला ही काही पडलेले दिसत नाही. गेली दहा ते बारा वर्षे उलटून गेले जवळजवळ एक तप झाले या राष्ट्रीय महामार्गाचे उघडे घोगडं अद्याप जैसे थे आहे. किती ठेकेदार आले किती गेले तसेच या कालावधीत किती निवडणुका आल्या किती गेल्या कोणी निवडून आले कोणी पराजय झाले. लाखो करोडो रुपये या राष्ट्रीय महामार्गावर खर्च केले जातात त्यात सदरील मार्गाची दुरुस्थीचेच काम अधिक त्यामुळे पळस्पे ते इंदापूर सत्तर ते ऐंशी किलोमीटरच्या कामाकरता गेली दहा ते बारा वर्षे लागली आजतागत किती करोडो खर्च झाले असतील याचा गणित करता येणार नाही मात्र काम पूर्ण तत्वावर नाही याला जबाबदार कोण, असा प्रश्न कायम कोकण प्रवासी वर्गाला पडला आहे.