पावसाळी पर्यटनासाठी फार्महाऊसला पसंती

। सुधागड -पाली । वार्ताहर ।
जुन महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यावर जिल्ह्यात हमखास पावसाळी पर्यटनाला उधाण येते. जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पांढरे शुभ्र धबधबे, समुद्र किनारे, धरणांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी, डोंगरावरून खळखळत वाहत येणार्‍या जलधारा पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र येथे होणारे अपघात आणि दुर्घटना यामुळे अशा धोकादायक ठिकाणी जाण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. परिणामी अनेकजण सुरक्षित पावसाळी पर्यटनासाठी निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या व ग्रामीण भागातील फार्महाऊसला पसंती देतांना दिसत आहेत. सध्या अशा फार्महाऊसच्या बुकिंग जोरात आहेत.
जिल्ह्यात, कर्जत, नेरळ, खालापूर, सुधागड, माणगाव, अलिबाग, पेण आदी तालुक्यात हजारोंच्या घरात फार्महाऊस निर्माण झाले आहेत. यातील अनेक फार्महाऊस पावसाळी पर्यटनासाठी वापरले जातात. काही फार्महाऊस सह्याद्रीच्या कुशीत डोंगररांगामध्ये आहेत. तर काही ऐतिहासिक किल्यांच्या सानिध्यात, तर काही समुद्रकिनारी यामुळे पावसाचा व निसर्गाचा मनसोक्त आनंद सुरक्षितपणे घेण्यासाठी अगदी पुण्या मुंबईतील पर्यटक देखील या फार्महाऊसना पसंती देतात.

सह्याद्रीच्या उंच आणि रांगड्या डोंगररांगानी वेढलेल्या व निसर्गसौंदर्याने नटलेल्या जिल्ह्यात पावसाळी पर्यटन म्हणजे पर्यटकांना जणु काही पर्वणीच असते. जुन महिन्यात पाऊस सुरू झाला कि पर्यटक निसर्गप्रेमींना वेध लागतात ते येथील धबधबे, वाहते पाण्याचे प्रवाह व धरणाच्या पाण्यात चिंब भिजण्याचे व मनसोक्त पावसाचा आनंद घेण्यासाठी सह्याद्रीच्या पर्वतरांगांकडे वळतात. मात्र काही दंगेखोर, दारुडे व अतिउत्साही पर्यटकांमुळे पर्यटनाला गालबोट लागते. म्हणून मग जिल्ह्यातील समुद्र किनार्‍यावर पर्यटकांना बंदी असते. अशा वेळी मात्र नेहमीच्या या ठिकाणांपेक्षा काही वेगळे व सुरक्षित ठिकाणी पावसाळ्याचा मनसोक्त आनंद पर्यटक लुटतात. त्यामध्ये ग्रामीण भागातील फार्महाऊस हे आता पावसाळी पर्यटनाचे नवीन हब झाले आहेत.

फार्महाऊसला पसंती
मित्र मैत्रिणी किंवा कुटुंबासमवेत निसर्गाच्या कुशीत वसलेल्या फार्महाऊसला जाणे अनेकजण पसंत करतात. येथील निसर्गरम्य वातावरण, जोडीला स्विमिंगपुलची मज्जा, काही ठिकाणी असणारे वॉटर राईड, बगीच्यात फिरण्याचा आंनद, घरगुती, चुलीवरील व ग्रामीण भागातील लज्जतदार जेवण, कॅम्प फायरचा आंनद, भोवताली वाहणारे छोटे मोठे ओढे यात मनसोक्त जलक्रीडा करण्याची मज्जा, शिवाय राहण्याची किंवा थांबण्याची उत्तम व्यवस्था असते. परिणामी सुरक्षित व निर्विघ्नपणे पावसाचा, भिजण्याचा व खाण्याचा आंनद घेत पावसाळी पर्यटन पार पडते.

पावसाळ्यात पर्यटकांचे पाय रायगड जिल्ह्याकडे वळतात. मात्र सुरक्षित पावसाळी पर्यटनासाठी फार्महाऊसला अधिक पसंती मिळत आहे. शहरातील पर्यटक आगाऊ बुकिंग करून ठेवतात. आलेल्या पर्यटकांना योग्य सोयी सुविधा देऊन पावसाळी पर्यटनाचा सर्वतोपरी आनंद देण्याचा आमचा प्रयत्न असतो.


-सुजित बारसकर, संचालक, ठाकूर फार्महाऊस, सुधागड

पावसाळ्यात धोकादायक धबधबे, समुद्रकिनारे येथे जाण्यापेक्षा सहकुटुंब फार्महाऊसला जाणे पसंत करतो. त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आंनद देखील मिळतो व सुरक्षित देखील राहता येते.

-प्रकाश मुद्राळे, पर्यटक, खारघर
Exit mobile version