। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यात अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे शिधापत्रिकांची पडताळणी मोहीम सुरू असून, यामध्ये अंत्योदय, केशरी आणि शुभ्र शिधापत्रिकांची तपासणी केली जाणार आहे. ही मोहिम 1 एप्रिल ते 31 मे पर्यंत सुरू राहणार आहे. शिधापत्रिकाधारकांना रहिवासाचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्यानंतर पंधरा दिवसांच्या मुदतीत रहिवासाचा पुरावा देऊ न शकणाऱ्या शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.
या शोध मोहिमेत एकाच पत्त्यावर दोन शिधापत्रिका तसेच एकाही विदेशी नागरिकाला शिधापत्रिका दिली जाणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले आहेत.
केंद्र सरकारकडून शिधापत्रिकेवरील धान्याबाबत लाभार्थ्यांचा इष्टांक ठरविला जातो. त्यामुळे नव्याने समाविष्ट होणाऱ्या लाभार्थ्यांना या इष्टांकात सामावून घेण्यासाठी अपात्र लाभार्थ्यांची शोध मोहीम राबवण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्यानुसार 1 एप्रिल ते 31 मे या काळात संबंध राज्यभर अपात्र लाभार्थी शोधले जाणार आहेत. यासाठी रास्त भाव दुकानदारांकडून अर्ज उपलब्ध करून दिला जाणार आहे. या अर्जासोबत शिधापत्रिकाधारकांना हमीपत्र द्यावे लागणार आहे.
अर्जासोबतच रहिवासाचा पुरावा म्हणून भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, गॅस जोडणी क्रमांकाची पावती, बँकेचे पासबुक, विजेचे बिल, फोन मोबाइल बिल, वाहन परवाना, कार्यालयीन तसेच अन्य ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड यापैकी एक दाखला द्यावा लागणार आहे.