पनवेलमधील जुन्या पुलाचा संरक्षक कठडा धोकादायक

सिमेंटचे मोठे तुकडे निखळले; दुर्घटनेची भीती, तातडीने दुरुस्तीची मागणी

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल शासकीय विश्रामगृहाजवळील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील नदीवरील पुलाच्या संरक्षक कठड्याची दुरवस्था झाली असून, पुलाच्या कठड्यावरील सिमेंटचे मोठमोठे तुकडे निखळून पडत आहेत. त्यामुळे हा संरक्षक कठडा कमकुवत झाला असून, तो कोणत्याही वेळी नदीपात्रात किंवा रस्त्यावर कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.

या पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. विशेषतः अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने पुलावर सातत्याने कंपन निर्माण होतात. त्यामुळे आधीच जीर्ण झालेल्या संरक्षक कठड्याला धोका निर्माण झाला आहे. कठड्याचा एखादा भाग अचानक रस्त्यावर कोसळल्यास वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच नदीच्या बाजूचा भाग कोसळल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पुलाच्या कठड्याला अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून, बांधकामातील सिमेंटचे आवरण निखळून गेले आहे. काही ठिकाणी लोखंडी सळ्या आणि इतर भाग उघडे पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुलाच्या संरक्षक कठड्याची तातडीने तांत्रिक तपासणी करण्याची गरज आहे.

पनवेल शहरातून पुढे पुणे, गोवा तसेच जेएनपीटीकडे जाण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. त्यामुळे या पुलावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. दररोज हजारो नागरिक आणि प्रवासी या मार्गाचा वापर करतात. अशा परिस्थितीत पुलाच्या संरक्षक कठड्याची झालेली दुरवस्था चिंतेचा विषय ठरत आहे.

पावसाळ्यात धोका अधिक
पावसाळ्यात पुलाच्या परिसरात पाणी आणि ओलावा वाढत असल्याने जीर्ण बांधकामाच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. अवजड वाहनांची सततची वाहतूक आणि पावसामुळे पुलाच्या संरचनेवर होणाऱ्या परिणामांचीही तांत्रिक तपासणी करणे आवश्यक आहे. संरक्षक कठड्याचा एखादा भाग अचानक रस्त्यावर कोसळल्यास वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ कठड्याची डागडुजी न करता पुलाच्या संपूर्ण संरचनेची पाहणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी
दररोज या मार्गावरून अनेक लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी प्रवास करतात. तरीही पुलाच्या दुरवस्थेकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. संरक्षक कठडा पूर्णपणे कोसळण्याची वाट न पाहता त्याची तातडीने दुरुस्ती करावी. धोकादायक भागात आवश्यकतेनुसार तात्पुरते संरक्षक कुंपण आणि इशारा फलक लावावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून धोकादायक भागाची दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पुलाची संपूर्ण संरचनात्मक तपासणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Exit mobile version