पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार
| खोपोली | प्रतिनिधी ।
खोपोली नगरपालिका परिसरात प्लास्टिक पिशवी बंदीचा नियमाला पूरक असा प्रयत्न म्हणून पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आणि खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या के एम सी महाविद्यालयाच्या विद्यार्थी वर्गाच्या सहभागाने जनजागरण रॅलीचे आयोजन केले गेले. खोपोली पोलीस स्टेशनच्या आवारातून निघालेल्या जनजागरण रॅलीच्या उपक्रमाचे उद्घाटन खोपोली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियमन मंडळाचे प्रादेशिक अधिकारी विद्यासागर किल्लेदार, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, किशोर पाटील, संजय पाटील, दिनेश गुरव, शेकाप तालुका चिटणीस संदीप पाटील, सुधाकर लहाने, गुरुनाथ साठेलकर, हनीफ कर्जीकर, अमोल कदम, प्रा. प्रताप पाटील आणि प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. शहरात आठवडा बाजार आणि दिवाळीनिमित्त खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती, त्यामुळे जनजागरण मोहिमेसोबत कागदी आणि कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आल्याची माहिती पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण जाधव यांनी दिली.