सामान्यांचे बजेट कोलमडले
| पनवेल । वार्ताहर ।
ऐन सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईची झळ बसणार आहे. दिवाळीच्या आधीच डाळींच्या दरात वाढ सुरू झाली आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे डाळींच्या पिकांनाही फटका बसला असून पावसामुळे अनेक ठिकाणी पीक पाण्याखाली गेले आहे तर काही ठिकाणी पाणी लागून नुकसानही झाले आहे. त्यामुळे डाळींचे उत्पादन कमी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच पावसामुळे तयार झालेले पीकही हातातून जाण्याची भीती शेतकर्यांना आहे. या सर्वांचा परिणाम डाळींच्या दारांवर होत असून त्यांच्या घाऊक आणि किरकोळ दरात वाढ सुरू झाली आहे. यावेळी सर्व डाळींच्या तुलनेत तूरडाळीचे दर सर्वाधिक वाढले आहेत. तूरडाळीचा भाव गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात चार ते पाच रुपयांनी वाढला आहे.
त्यामुळे घाऊक बाजारात तूरडाळ 110-120 रुपये किलोपर्यंत गेली आहे. तर, किरकोळ बाजारात हे दर 120, 125 ते 130 रुपये किलोपर्यंत आहेत. उडीद डाळ 97 ते रुपये किलो दराने मिळत होती. 100 मात्र ऐन दिवाळीआधी उडीद डाळीचा दर 105 ते 110 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मूगडाळ घाऊक बाजारात 90 ते 100 रुपये आहे. किरकोळ बाजारात मूगडाळ 100 ते 120 रुपये किलो झाली आहे. दिवाळीत चणाडाळीला सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे चणाडाळही महागली आहे. चणाडाळ 59 ते 65 रुपये किलो असून किरकोळ बाजारात 60 ते 70-75 रुपये किलो झाली आहे.