| धाटाव | प्रतिनिधी |
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या रोहा तालुक्यात ‘हनुमान जयंती’चा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. चैत्र महिन्याच्या शुभ मुहूर्तावर तालुक्यातील सर्वच हनुमान मंदिरांमध्ये जन्मोत्सवाचा सोहळा पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी मारुतीरायांच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
रोहा शहरातील मुख्य मारुती मंदिर, अष्टमी येथील पुरातन मंदिर, तसेच वरसे, धाटाव, किल्ला, कोलाड, सुतारवाडी, चणेरा या परिसरातील हनुमान मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. पहाटे 5 वाजल्यापासूनच मंदिरांमध्ये विधीवत पूजा, अभिषेक आणि आरतीला सुरुवात झाली. बरोबर सूर्योदयाच्या वेळी पाळणा हलवून आणि गुलाल-फुलांची उधळण करून ‘बजरंग बली’चा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. बोला जय हनुमानच्या गजराने लहानग्यांनी आकर्षक वेशभूषा करून उत्सवाचा आनंद लुटला.
या उत्सवाचे औचित्य साधून तालुक्यात ठिकठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन, प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक मंदिरांमध्ये स्थानिक भजनी मंडळांनी पहाटेपासूनच विठ्ठल-रुक्मिणी आणि हनुमंताच्या नामाचा गजर सुरू केला. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
संध्याकाळच्या सुमारास काही ठिकाणी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीम पथकांच्या सादरीकरणामुळे मिरवणुकीत मोठी रंगत आली होती. मंदिरा बाहेर हार, नारळ, फुगे, आईस्क्रीमची दुकाने सुद्धा होती. तालुक्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातही हनुमान जयंतीचा उत्साह ओसंडून वाहात होता. गावागावातील हनुमान मंदिरांना ग्रामस्थांनी एकत्र येऊन सजवले होते. शेती कामाची लगबग असली तरी, बळीराजाने आपल्या आराध्य देवतेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मोठी गर्दी केली होती. हनुमान जयंतीच्या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. प्रशासनाच्या वतीने आणि पोलीस दलाच्या वतीने सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, ज्यामुळे हा सोहळा शांततेत पार पडला. ‘सियावर रामचंद्र की जय’ आणि ‘पवनपुत्र हनुमान की जय’च्या घोषणांनी संपूर्ण रोहा तालुका भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.






