जिल्ह्यातील गुणीजनांचा रायगड भुषणने सन्मान

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषदेतर्फे दिल्या जाणार्‍या प्रतिष्ठेच्या रायगड भूषण पुरस्कारांचे वितरण माजी मंत्री मीनाक्षी पाटील, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार बालाराम पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते रविवारी अलिबाग येथील पी.एन.पी. नाट्यगृहात शानदार कार्यक्रमात करण्यात आले. जिल्ह्यातील सामाजिक, अध्यात्मिक, क्रीडा, अभिनय, पत्रकारिता आदी तसेच विविध क्षेत्रात विशेष नाविण्यपूर्ण व उल्लेखनिय कामगिरी केलेल्या व्यक्तींना रायगड भुषणने सन्मानित करण्यात आले. यात ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड प्रदीप घरत, बाल गिर्यारोहक शर्विका म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार वसंत चौलकर, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे, विजय कुवेसकर, हरिश्‍चंद्र महाडीक, आंतरराष्ट्रीय कराटेपटू प्रसाद चौलकर, पत्रकार अ‍ॅड रत्नाकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, छायाचित्रकार नितीन शेडगे, हर्षल मोरे, रांगोळीकार विरेश वाणी आदींसह अनेकांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, आघाडीचे गटनेते अ‍ॅड आस्वाद पाटील, अर्थ व बांधकाम सभापती नीलिमा पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता जाधव, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे, पनवेल नगरपालिका माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व पक्षांचे पक्षप्रतोद, जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, सर्वप्रथम परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी यांना रायगड भूषण पुरस्कार देऊन रायगड जिल्हा परिषदेने काही वर्षांपूर्वी या पुरस्कारांची सुरुवात केली. त्यानंतर नियमितपणे रायगड भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत.रायगड भुषण पुरस्काराची सर्वजण आतुरतेने वाट पहात असतात. 2019 नंतर कोविड निर्बंधांमुळे आज दोन वर्षांनंतर रायगड भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात येत आहे. त्यामुळे पुरस्कारर्थींची संख्या जास्त असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्याची सुचना देखील त्यांनी यावेळी केली.

आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून, समाजासमोर आदर्श ठेवणार्‍या व्यक्तींचा रायगड जिल्हा परिषदेतर्फे रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे. रायगड भूषण पुरस्कार अत्यंत मानाचा पुरस्कार असून, हा पुरस्कार भेटलेल्यांची जबाबदारी आणखी वाढली असल्याने त्यांनी यापुढे आणखी जोमाने काम करावे.

अदिती तटकरे, पालकमंत्री

समाजात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांना रायगड भूषण पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कार प्राप्त व्यक्तींची संख्या जास्त आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करणार्‍या व्यक्ती जिल्ह्यात आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आणखी जोमाने काम करावे.

योगिता पारधी, अध्यक्षा, जिल्हा परिषद रायगड

समाजात योगदान देणार्‍या व्यक्तींचा सन्मान करण्याच्या भावनेतून रायगड जिल्हा परिषदेतर्फे रायगड भूषण पुरस्कार देण्यात येत आहे. यापुढेही पुरस्कार देण्याची परंपरा अशीच सुरू राहील. दोन वर्षानंतर पुरस्कार सोहळा होत असल्याने पुरस्कार प्राप्त व्यक्तींची संख्या जास्त आहे.

सुधाकर घारे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद रायगड
Exit mobile version