323 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई
| अलिबाग | प्रतिनिधी |
कृष्ण जन्माष्टमी व गोपाळकालाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडवून आनंदाच्या सोहळ्यात विरजण घालणाऱ्या 323 गाव गुंडांना रायगड पोलिसांनी दणका दिला आहे. यातील 50 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करून अदखलपात्र गुन्हे दाखल केले असून 273 जणांना गुन्ह्याचे कृत्य होणार नसल्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहेत.
कृष्ण जन्माष्टमीनंतर गोपाळकाला अबालवृध्दांपासून सर्वांच्याच पसंतीला उतरलेला सण म्हणून ओळखला जातो. गोपाळकालानिमित्त ग्रामीण भागापासून शहरी भागात ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम साजरा केला जातो. गोविंदा रे गोपाला…असा जयघोष करीत गल्लीबोळ्यातून मिरवणुका काढल्या जातात. यावर्षी आठ हजारपेक्षा अधिक ठिकाणी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यात मिरवणूकाही काढल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरी भागासह ग्रामीण भागात प्रचंड गर्दी होते.
या गर्दीचा फायदा घेत काही समाजकंटक कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करण्याचा धोका नाकारता येत नाही. सण-उत्सवास गालबोट लागू नये. सण उत्सव आनंदात साजरे करता यावेत, यासाठी रायगड पोलिसांनी गेल्या महिन्याभरापासून कंबर कसली आहे. गोपाळकालानिमित्त दहीहंडी व मिरवणुकीच्या कार्यक्रमात वाद होऊ नये, यासाठी 323 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यापुर्वी गुन्हे दाखल असलेले तसेच काही कारणास्ताव वाद निर्माण करणाऱ्या गावगुंडाना दणका देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सण-उत्सव आनंदात साजरे करावे, असे आवाहन रायगड पोलिसांकडून करण्यात येत आहेत.