वाहतूक कोंडींने रायगडच्या पर्यटनाला ब्रेक

खराब रस्त्यांनी सारे हैराण
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

निसर्गाचे वरदान लाभूनही खराब रस्त्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी जिल्ह्याच्या पर्यटनाला बाधा आणत आहे. याचा थेट परिणाम पर्यटनावर अवलंबून असलेल्या प्रत्येक छोट्या,मोठ्या घटकांना बसत आहेत.

समुद्र किनारे, मंदिरे,ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी पर्यटकांसह शाळकरी व महाविद्यालयीन सहली ओघ प्रचंड आहे. यामुळे पर्यटनावर अवलंबुन असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, दुकानदार यांची सध्या चलती आहे. मात्र असे असले तरी येथे दाखल होणारे पर्यटक, भाविक व प्रवासी खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे पुरते हैराण झाले आहेत. वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना तासंतास खोळंबून रहावे लागते. तसेच इच्छितस्थळी पोहचण्यास देखील उशीर होतो.

जिल्ह्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह राज्य व अंतर्गत मार्गाची अवस्था वाईट आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत सुरु आहेत. परिणामी येथे येणार्या पर्यटकांना खाचखळगे, खड्डे, अरुंद मार्ग आणि वारंवार होणारी वाहतुक कोंडी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे फटका पर्यटन व्यवसायाला देखील बसत आहे. खराब रस्ते व वाहतूक कोंडी यामुळे असंख्य पर्यटकांनी जिल्ह्याकडे पाठ फिरविलेली पहायला मिळत आहे. परिणामी येथील पर्यटन व्यवसायावर संकट ओढवले आहे.

याबरोबरच जिल्ह्यातील इतर छोट्या-मोठ्या पर्यटन स्थळांकडील मार्गांची देखिल दुरवस्था झालेली आहे. ते अतिशय अरुंद देखील आहेत. त्यामुळे अंतर्गत पर्यटनस्थळांना भेटी देणार्‍या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड सामना करावा लागतो. हि स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर या सर्व रस्त्यांची चांगल्या प्रकारे देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच कोणताही रस्ता बनवितांना योग्य नियोजन करुन काम वेळेत पुर्ण करणे गरजेचे आहे. तसेच महामार्ग, राज्यमार्ग व अंतर्गत रस्ते रुंद करणे, रस्त्याच्या कडेची अतिक्रमणे हटविणे, आवश्यक तेथे नियमित वाहतूक पोलीस तैनात ठेवणे, बायपास मार्गांचा पर्याय देणे, आवश्यक तेथे अवजड वाहतूक बंद करणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर कारवाई करणे आवश्यक आहे. तरच पर्यटकांचा अधिक ओघ जिल्ह्यात वाढेल आणि पर्यटन व्यसायाला व विकासाला चालना मिळेल.

Exit mobile version