। मुंबई । प्रतिनिधी ।
आमदार स्व. रमेश लटके यांच्या निधनामुळे होणार्या अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल आणि ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत दुरंगी लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली असून मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार असून भाजपसोबत युती करणार नसल्याचं पक्षाच्या पदाधिकार्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणूकीत स्व. रमेश लटके यांच्या पत्नी ॠतुजा लटके यांना पाठिंबा दिला आहे. तसेच भाजपनेदेखील निवडणूकीतून माघार घेण्याची विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्याबाबतचे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं पत्र त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट केले आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले की, कै. रमेश लटके चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरु झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होण्याने कै. रमेश लटके यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदारांच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढविण्याचं धोरण स्वीकारतो. तसे करण्याने त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो, अशी माझी भावना आहे. आपणंही तसेच करावे, असेही त्यांनी सांगितले. असे करणे हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे, असे वाटत असल्याचेही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.