| पनवेल | वार्ताहर |
दीपावली निमित्त राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने पनवेल येथे श्री देवगिरी किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. नागरिकांमध्ये इतिहासाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, तसेच गडकोटांप्रति आदरभाव निर्माण व्हावा या उद्देशाने प्रतिष्ठान मागील 18 वर्षे सातत्याने पुणे तसेच पनवेल येथे कार्य करीत आहे.
पनवेल विभागाचे संघटक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. किल्ला अभ्यास मोहिमेपासून ते किल्ला उभारणीपर्यंत पनवेल विभागाच्या सर्व कार्यकर्त्यांनी खुप मेहनत घेतली. या प्रतिकृतीच्या दुर्ग दर्शन सोहळ्याचे उद्घाटन शनिवारी पार पडले. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे तसेच कर्नल प्रशांत काकडे (आसाम रेजिमेंट) आणि ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या हस्ते गडपूजन झाले.
या कार्यक्रमास वारकरी महामंडळाचे संचालक धनाजी महाराज पाटील, राजे शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश पोवळे, यांच्यासह प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या वेळी पर्यावरण वाचवा हा संदेश घेऊन आयोध्या येथून चालत आलेल्या आशुतोष पांडे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आशुतोष यांनी आता पर्यंत 9400 किलोमीटरचा देशातील विविध राज्यात पायी प्रवास केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपली संस्कृती आहे. तुम्ही-आम्ही ताठ मानेने जगू शकलो. त्यांचा चुकीचा इतिहास सांगणाऱ्या लोकांना उत्तरे देण्यासाठी शिव चरित्र वाचा, असे शिरीष महाराजांनी आपल्या व्याख्यानात सांगितले.
मनोज सानप यांनी हुतात्मा कर्नल विनायक गोरे यांच्या आईचे आत्मकथन एकपात्री अभिनय करत सादर करून अंगावर रोमांच उभे केले. या सोहळ्याचे उत्सव प्रमुख जितेश पवार तसेच कार्यक्रम प्रमुख वैभव झांबरे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत भोसले यांनी केले, तसेच केतन गुरव यांनी आभार प्रदर्शन केले. हि प्रतिकृती 18 नोव्हेंबर पर्यंत सर्वाना पाहण्यास खुली ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.