‘जय हिंद, भारत माता की जय’…अलिबागेत घुमला जयघोष

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
‘भारत माता की जय’, ‘जय जवान जय किसान’, ‘भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव चिरायू हो’, अशा घोषणांनी सारे अलिबाग शनिवारी सकाळी दुमदुमून गेले. निमित्त होते स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीचे. देशभक्तीपर गीतांच्या तालावर हातात तिरंगा ध्वज अभिमानाने घेत शेकडो विद्यार्थी, नागरिक, प्रशासकीय अधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पाश्‍वर्र्भूमीवर अलिबाग येथे तिरंगा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. संपूर्ण अलिबाग शहर या रॅलीतील देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमून गेले.

पोलीस मुख्यालयाला करण्यात आलेली विद्युत रोषणाई

या तिरंगा यात्रेत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार विशाल दौंडकर, सचिन शेजाळ, ज्ञानदेव यादव, डॉ.सतिश कदम, अलिबाग तहसिलदार मिनल दळवी, मुरुड तहसिलदार रोहन शिंदे यांच्यासह इतर मान्यवर सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाला केलेली विद्युत रोषणाई

शहरात सर्वत्र रॅली
या भव्य तिरंगा यात्रेची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून राष्ट्रगीताने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, मारुती नाका, बालाजी नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अलिबाग नगरपरिषद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महावीर चौक, जुनी नगरपालिका इमारत मार्गे ब्राह्मम आळी, कन्याशाळा, जिल्हा न्यायालय या मार्गाने मार्गस्थ होवून हिराकोट तलाव येथे राष्ट्रगीताने यात्रेची सांगता करण्यात आली. या दरम्यान, क्रांतीस्तंभ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सरखेल कान्होजी आंग्रे समाधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या तिरंगा यात्रेत शहरातील सर्व सरकारी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच इतर शासकीय कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी, पोलीस बँड पथक, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय आरोग्य, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसहायता समूहामधील महिला, प्रिझम सामाजिक विकास संस्था, स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, सक्षम एज्युकेशन सोसायटी, माणुसकी प्रतिष्ठान, लाईफ फाऊंडेशन, स्पर्धाविश्‍व अ‍ॅकॅडमी या व इतर विविध सामाजिक संघटना, जेएसडब्ल्यू, रिलायन्स, आरसीएफ अशा विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, जेएसएम महाविद्यालयाचे विद्यार्थी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, जिल्हा होमगार्ड, अलिबाग वकील संघटना, रास्तभाव धान्य वितरण केंद्राचे पदाधिकारी, सदस्य, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या संपूर्ण रॅलीमध्ये पोलिसांच्या बँड पथकाने विविध देशभक्तीपर गीतांच्या धून वाजवून वातावरण चैतन्यमय केले. संपूर्ण कार्यक्रमाच्या समन्वयाची जबाबदारी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील व तहसिलदार (सर्वसाधारण) विशाल दौंडकर, तहसिलदार (महसूल) सचिन शेजाळ यांनी पार पाडली.

रॅलीच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या वीर हुतात्म्यांना अभिवादन करीत आहोत. आपण जो उत्साह दाखविला त्याच उत्साहाने 15 ऑगस्टला ध्वजारोहण करुया. हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या अभियानांतर्गत शासकीय कार्यालये, नागरिकांनी दि.13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा फडकवावा. तसेच प्रत्येकाने किमान 10 घरांवर झेंडा फडकविण्याचे आवाहन करावे व हे अभियान यशस्वी करावे.

डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी

Exit mobile version