| रत्नागिरी | प्रतिनिधी |
मूल होत नाही म्हणून हिणविण्याच्या रागातून पाच वर्षांच्या चिमुरडीचा पाण्यात बुडवून खून केल्याचा धक्कादायक प्रकार कसलये-तिस्क फोंडा (गोवा) येथे घडला. खुनानंतर घराच्या बाजूला मृतदेह पुरण्यात आला होता. मृत मुलीचे नाव अमेरा ज्युडान अन्वारी (5) असे असून, ती मूळ रत्नागिरी शहरातील राजीवडा येथील असून, कौटुंबिक कारणावरून आईसह ती आणखी एका बहिणीसह आजीकडे गोव्याला राहात होती. गोवा पोलिसांनी संशयित पती-पत्नीला अटक केली आहे. संशयित महिला सांगली जिल्ह्यातील असल्याचे समजते. बाबासाहेब ऊर्फ पप्पू अल्हाट (53), पत्नी पूजा अल्हाट (39), रा. फोंडा, मूळ सांगली असे अटक केलेल्या दांपत्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्सारी आणि अलाट कुटुंबीय परप्रांतीय असून, मागील अनेक वर्षे गोव्यात राहत आहेत. पप्पू आणि त्याची पत्नी पूजा या दांपत्याला मूलबाळ नाही. त्यामुळे मूलबाळ होण्याबरोबरच समृद्धी मिळावी, या हेतूनेच हा ‘नरबळी’ दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आहे. अमेरा बुधवारी (दि.05) सकाळपासून बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी व शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरु केली होती. त्यानंतर फोंडा पोलिस स्थानकात अमेराच्या आईने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. फोंडा पोलिसांनी तपासाला वेग देताना वस्तीत घरोघरी सखोल चौकशीला सुरूवात केली. बाबासाहेब याच्याकडे बुधवारी चौकशी केली असता ते थोडे गडबडले होते. गुरुवारी पुन्हा त्याची चौकशी केली असता ते असंबद्ध उत्तरे देऊ लागले आणि येथेच अडकले. बाबासाहेब हे एक उत्कृष्ट वेल्डर आहे. कसलये येथे राहण्यापूर्वी तो धारबांदोडा संजीवनी साखर कारखान्याजवळ राहत होता. लग्नाला वीस वर्षे उलटली तरी या दांपत्याला मुलबाळ होत नव्हते, त्यामुळे त्याने जादू टोण्याने मूल व्हावे, समृद्धी यावी यासाठी हे अघोरी कृत्य केले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस त्यादृष्टीने चौकशी करीत आहेत. अमेरा अन्वारी ही आपल्या आई आणि एका भावंडासह कसलये येथे राहत होती. अमेराची आईला लग्न करून रत्नागिरीला दिले होते. पण नवरा मारझोड करीत असल्याने ती दोन्ही मुलांसमवेत कसलये येथे आपल्या आईच्या घरी वर्षभरापूर्वी रहायला आली होती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.