बंद दालनात अधिकार्यांसोबत बैठक घेणार्या आमदारांविरोधात नाराजी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आरसीएफच्या पीआर /पीएन तंत्रज्ञानावर आधारित नवीन 1200 एमटीपीडी (डीएपी आधार) एनपीके / डीएपी कॉम्प्लेक्स फर्टिलायझर प्लांट उभारण्याच्या विस्तारीत प्रकल्पाची पर्यावरण विषयक जनसुनावणी मंगळवारी हॉटेल साई-इन येथे आयोजित केली जनसुनावणीकडे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी पाठ फिरवत ऐनवेळी कायदा सुव्यवस्थेचे कारण देत रद्द करण्यात आल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करीत संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या.
या सुनावणीसाठी मोठया प्रमाणावर ग्रामस्थ नागरिक, प्रकल्पग्रस्त व लोकप्रतिनिधी आरसीएफ कंपनी प्रशासनाच्या विरोधात एकत्र येऊन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, दि.15 आयोजित जनसुनावणी रद्द करण्यात येत असून, सदर जनसुनावणी पुढे ढकलण्यात येत आहे असे पत्र जिल्हा प्रशासनामार्फत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिल्यानंतर आजची जन सुनावणी पुढे ढकलण्यांत आली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार महेंद दळवी यांनी मोठया प्रमाणावर जनसुनावणीला परिसरातील जनता दोन तास तिष्ठत बसलेली असताना परस्पर बंद दालनात अधिकार्यांसोबत बैठक घेऊन त्यानंतर दोन तासांनी जनसुनावणी सभागृहात उपस्थित राहून थेट जनसुनावणी स्थगित केल्याचे बेकायदेशीररित्या जाहिर केल्याने जनतेने मोठया प्रमाणावर नाराजी व्यक्त केली. यावेळी ग्रामस्थ आणि आमदारांच्या शाब्दीक चकमक देखील उडाली.
यावेळी इतर उपस्थित ग्रामस्थ मात्र संतप्त झाले. आर.सी.एफ.मुळे होणार्या समस्या आम्हाला मांडायच्या होत्या. परंतु इथे जिल्हाधिकारी यांच्यासह कोणीही जबाबदार अधिकार लोकांना सामोरा गेला नाही. लोक चार तास जनसुनावणीच्या हॉलमध्ये बसून होते परंतु लोकांची साधी चौकशी कोणी केली नाही. ठराविक गटासोबत कंपनीचे व सरकारचे अधिकारी चर्चा करीत होते तर लोकांना या सुनावणीसाठी हजर रहाण्याचे आवाहन सरकारने कशासाठी केले? लोकांना काही कामधंदे आहेत की नाहीत? अशी संतप्त प्रतिक्रीया लोकांनी यावेळी व्यक्त केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी विदयाधर किल्लेदार, आर.सी.एफचे कुळकर्णी, उपप्रादेशीक अधिकारी आर एस कामत वरसोली ग्रामपंचायत सदस्य सुरेश घरत, नवगावचे माजी सरपंच फीडी कटोर, गजानन कुलपे, काँग्रेस प्रदेश काँग्रेसचे चिटणीस अॅड.प्रविण ठाकूर, समाजकल्याण माजी सभापती दिलीप भोईर, वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, प्रांत अधिकारी प्रशांत ढगे, धनंजय खामकर, जनसंपर्क अधिकारी हर्षला पाटील, संतोष वझे आदी अधिकारी उपस्थित होते.
दोन तास जनतेला ताटकळत ठेवल्यानंतर बंद दालनात अधिकार्यांसोबत बैठक घेऊन परस्पर जिल्हाधिकार्यांसोबत बोलणे करुन जनसुनावणी रद्द केल्याचे जाहीर केल्याने आ महेंद्र दळवी यांच्या विरोधात जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी दळवी आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दीक चकमक देखील उडाली. विरोध करणार्यांना याला बाहेर घे अशा शब्दात आमदारांनी धमकावल्याने आणखी गोंधळ निर्माण झाला होता.
जनसुनावणी जनतेची मतं जाणून घेण्यासाठी लावण्यात आली होती. प्रदुषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी आणि आरसीएफ अधिकार्यांची लोकं वाट बंघत होती. मात्र आपल्या भावना, प्रश्न मांडण्याची संधीच जनतेला मिळाली नाही. थळ, नवगाव, वरसोली मध्ये सीएसआर फंडच वापरला जात नाही. या संदर्भात प्रश्न मांडायचे होते. येणार्या प्रकल्पाला आमचा विरोध नाही मात्र या प्रकल्पामध्ये पीएपीना घेण्याची मागणी करायची होती. कंत्राटी कामगारांऐवजी कायमस्वरुपी कर्मचारी परिसरातील घ्यावेत. अशा अनेक मागण्यांची विचारणा करायची होती. जनसुनावणी रद्द करण्याची घोषणा आयोजन करणार्या अधिकार्यांनी जाहीर करायला हवी होती. मात्र ज्यांना अधिकार होता त्यांनी जाहिर न केल्याने आम्ही प्रशासनाचा निषेध करतो.
सुरेश घरत
कार्यकर्ते शेकापक्ष
जनसुनावणीला उपस्थित असलेल्या लोकांना बाजुला ठेऊन अधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत काय झाले याची कल्पना नाही. यामुळे जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. उद्या हे परस्पर प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली त्यांचे सेटलमेंट करतील. प्रदुषण सहन करणार्या ग्रामस्थांकडे स्थानिक आमदारांचे लक्ष नाही. जनसुनावणीपूर्वी थळ ग्रामस्थांची बैठक घेण्याचे दिलेले ग्रामसभेतील आश्वासन दिले होते. ती न घेता आमदारांनी खोटारडेपणा दाखवलेला आहे. जनतेला सुविधा न देता आरसीएफ ग्रामस्थांची फसवणूक करीत आहे.
शिरीष राजके
कामगार नेते शेकाप
आजच्या बैठकीत कोणताही विचार किंवा निर्णय झाला नाही. स्थानिक आमदारांनी जिल्हाधिकार्यांसोबत फोनवरुन संभाषण साधल्यानंतर जनसुनावणी स्थळी येऊन जनसुनावणी रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. हा चुकीचा प्रकार होता. स्थानिकांचे प्रदुषण, रोजगार इतर समस्या हे सर्व प्रश्न घेऊन लोकं आली होती. त्यावर चर्चा न झाल्याने ग्रामस्थ नाराज झाले. सदर जनसुनावणी रद्द झाल्याचे जिल्हाधिकार्यांनी जाहीर करणे गरजेचे होते मात्र तसे न झाल्याने आम्ही याचा निषेध व्यक्त करत आहोत.
दिलीप भोईर
माजी सभापती समाज कल्याण
दोन तास आम्हाला ताटकळत ठेवले होते. कुणीच अधिकारी आमच्याकडे पहायला तयार नव्हते. इतक्या वर्षांचे आमचे प्रश्न समस्या आम्हाला मांडायचे होते. ही संधी आलेली असताना ही जनसुनावणी रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे आणि रद्द कोणी केली. आमच्या अनेक समस्या असून त्याकडे सर्वच दुर्लक्ष करीत आहेत.
पीडी कटोर
माजी सरंपच नवगाव