संबंध अजून तुटण्याआधी भाजपाशी जुळवून घ्या

आ.प्रताप सरनाईकांचं उद्धव ठाकरेंना पत्र!
मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात एकीकडे काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात असताना दुसरीकडे शिवसेनेमधूनच भाजपासोबत पुन्हा युती करण्यासाठी मागणी केली जात आहे. त्यासंदर्भातलं एक पत्रच शिवसेना आ.प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे आधीच महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्‍न उपस्थित केलं जात असताना प्रताप सरनाईक यांच्या या लेटरबॉम्ब मुळे ते प्रश्‍नचिन्ह अधितच मोठं झाल्याचं दिसू लागलं आहे. या पाश्‍वर्र्भूमीवर आता शिवसेनेकडून या पत्रावर काय खुलासा येतो, याकडे राजकीय विश्‍वाचं लक्ष लागलं आहे.

या पत्रामध्ये प्रताप सरनाईक यांनी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. या परिस्थितीमधे जे राजकारण सुरू आहे, त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असतील, आपला पक्ष कमकुवत करत असतील, तर या स्थितीत मला पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकार्‍यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल, अशी थेट मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

कोणतीही चूक नसताना आम्हाला त्रास!
दरम्यान, या पत्रामध्ये प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल तक्रार केली आहे. कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दलाल व शिवसेनेमुळे माजी खासदार झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरू आहे, त्यालाही कुठेतरी आळा बसेल, आम्हाला टार्गेट करत असताना आमच्या कुटुंबियांवर सुद्धा सतत आघात होत आहेत. खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला, की दुसर्‍या केसमध्ये जाणीवपूर्वक गुंतवणे असे प्रकार होत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे थांबेल, असं सरनाईक यांनी नमूद केलं आहे.

Exit mobile version