पेण | वार्ताहर |
जेएसडब्ल्यू कंपनीने खारबंदिस्तीच्या कामाचे बिल दिले नाही म्हणून गेल्या दोन दिवसांपासून अमरचंद म्हात्रे पेण येथील उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. त्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी सोमवारी दुपारी 12 वाजता आपल्या दालनात बैठकीचे आयोजन केले आहे.
कोप्रोली खारबंदिस्तीसंदर्भात जेएसडब्ल्यू कंपनीकडून सी.एस.आर. फंडातून निधी उपलब्ध करुन खारबंदिस्तीचे काम पूर्ण करण्याचे ठरले. कंपनी अधिकार्यांनी याबाबत तोंडी आश्वासन दिले होते. त्यानुसार, कोप्रोली ग्रामस्थ व शेतकर्यांनी प्रथम खर्च करण्यासाठी लोकवर्गणीतून पैसे जमा केले. मात्र, ते पैसे पुरेसे नसल्याने त्यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर (हरी ओम) म्हात्रे यांच्याकडे खारबंदिस्तीच्या कामासाठी आर्थिक मदतीची मागणी केली. त्यानुसार प्रभाकर म्हात्रे यांनी दहा लाखांची मदत कोप्रोली ग्रामस्थांना केली. त्या निधीतून खारबंदिस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.
प्रभाकर म्हात्रे यांच्याकडून घेतलेली दहा लाख रुपयांची मदत कंपनीने बिल दिल्यावर तात्काळ परत देण्याची बोली ग्रामस्थांनी दिली होती. मात्र, नंतर कंपनी प्रशासन आपल्या शब्दावरुन फिरले आणि कोप्रोली खारबंदिस्तीच्या कामासंदर्भात आमचा काहीही संबंध नाही, असे सांगण्यास सुरुवात केली, असे कोप्रोली शेतकर्यांचे म्हणणे आहे. कंपनी प्रशासनाच्या सांगण्यावरुनच कोप्रोली ग्रामस्थांनी खारबंदिस्तीचे काम हाती घेतले होते. या कामासाठी लागणारी यंत्रसामुग्री ही अमचंद म्हात्रे यांची घेतली होती. अमचंद म्हात्रे यांना ठरलेली रक्कम देण्यात आली आहे, असेही कोप्रोलीकर सांगतात.
खर्च करुनही कंपनी प्रशासन सी.एस.आर. फंडातून बिल अदा करत नसल्याने कोप्रोली ग्रामस्थांची मोठी पंचाईत होऊन बसली आहे. यासंदर्भात कोप्रोली सरपंच विकास पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, या कामासाठी कोप्रोलीतील शेतकरी व जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे यांनी खर्च केला आहे, हे सत्य आहे. काम पूर्ण झाल्यानंतर कोप्रोली ग्रामपंचायतीचा अभिनंदनाचा ठराव मी जेएसडब्ल्यू कंपनी प्रशासनला दिला आहे. जर कंपनी प्रशासन बिल देण्याची जबाबदारी झटकत असेल, तर अभिनंदनाचा ठराव स्वीकारला कसा, असा सवाल पाटील यांनी केला आहे.