। मालवण । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यात होणाऱ्या आगामी निवडणुका आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जाव्यात असे वरिष्ठांचे आदेश आहेत. मात्र अद्यापपर्यंत पालिका निवडणुकांचे सूत्र ठरलेले नाही. त्यामुळे, या निवडणुकांमध्ये सन्मानपूर्वक आघाडी झाली तर ठीक आहे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर सर्व जागा लढविण्याचा प्रयत्न करेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
येत्या काळात पालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या केव्हाही लागू शकतात. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्ररित्या तयारी सुरू केली आहे. येत्या काळात ग्रामीण भागातील ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. तीन पक्षाचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवर योग्य तो निर्णय घेण्याचे निश्चित केले आहे.
कोणत्याही पक्षाला आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचे स्वातंत्र्य आहे. आम्हाला महाविकास आघाडीची बंधने मंजूर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून चांगली कामे होत आहेत. सर्वांना न्याय देण्याचे काम केले जात असल्याने नवीन लोक पक्षात सामील होत आहेत. त्यामुळे त्यांना संधी देण्याची जिल्हाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे.
अमित सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष