| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. सर्वत्र प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असून तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे वर्चस्व दिसून येत आहे. करंजाडे येथे थेट सरपंच पदाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रामेश्वर बबन आंग्रे आणि अकरा सदस्यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या सभेमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या तोफा धडाडल्या.
यावेळी शिवसेना नेते बबन पाटील,काँग्रेसचे आर.सी.घरत, शेकापचे काशिनाथ पाटील, राजेंद्र पाटील, नारायण शेठ घरत, नंदराज मुंगाजी आदी प्रमुख मान्यवरांच्यासह महाविकास आघाडीचे नेते यावेळी मंचावर उपस्थित होते. करंजाडे सेक्टर 4 येथील टाटा पॉवर केंद्रासमोरील भूखंडावर या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते.
बबन दादा पाटील यांनी आपल्या घणाघाती भाषणात महाविकास आघाडीने गरजेपोटी बांधलेल्या घरांना नियमित करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचा पुनरुच्चार केला तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे कैवारी असणारे लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठराव केला असल्याचे सांगितले. रामेश्वर आंग्रे यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर येथील जनता आम्हाला पुन्हा निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर आजच्या सभेला असणारी उत्स्फूर्त उपस्थिती याने रामेश्वर आंग्रे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले असल्याचे त्यांनी सांगितले.
राजेंद्र पाटील यांनीही शेकापने ज्या नेत्यांना मोठे केले तेच नेते पक्षाच्या जीवावर उठले असल्याचे सांगितले.अशा दुतोंडी लोकांना धडा शिकवा असे कार्यकर्त्यांना आवाहन केले. काँग्रेसचे आर सी घरत , विक्रांत घरत यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मंचावर कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, मेघाताई दमडे, नारायण खर्जे, राजकुमार पाटील संदीप म्हात्रे, मल्लिनाथ गायकवाड, माधुरी गोसावी, कविता मकवाना आदी मान्यवर उपस्थित होते.
आम्ही मात्र केलेल्या विकास कामांच्या जोरावरती मते मागत आहोत. पण विरोधकांना मात्र अपप्रचार करण्याची वेळ आली आहे. करंजाडमधील मतदार अत्यंत सुज्ञ आहे. त्यामुळे कोण प्रचार करतोय आणि कोण अपप्रचार करतोय यातला फरक ते सारेच जण जाणतात. – रामेश्वर आंग्रे.सरपंचपदाचे उमेदवार