पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

। पुणे । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून बारावीच्या नव्या अभ्यासक्रमानुसार झालेल्या परीक्षेत 25.87 टक्के, जुन्या अभ्यासक्रमानुसार झालेल्या परीक्षेत 27.31 टक्के आणि दहावीच्या परीक्षेत 29.14 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
राज्य मंडळाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे पुरवणी परीक्षेच्या निकालाबाबत माहिती दिली. गेल्या वर्षीच्या पुरवणी परीक्षेच्या तुलनेत यंदाचा निकाल 7.46 टक्क्यांनी वाढला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषय सोडून) कोणत्याही विषयात मिळवलेल्या गुणांची पडताळणी, छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे अर्ज करता येईल. दहावीच्या विद्यार्थ्यांना https://varificatuin.mh-ssc.ac.in/ आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ttps://varificatuin.mh-hsc.ac.in// या संकेतस्थळाद्वारे स्वत: किंवा शाळा-कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येईल. गुणपडताळणीसाठी 21 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर, छायाप्रतीसाठी 21 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करून शुल्क ऑनलाइन भरता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version