| खांब-रोहा | वार्ताहर |
दिवसेंदिवस तापमानाचा पारा अधिकाधिक चढत चालला असल्याने प्रत्येका जीव अगदी कासावीस होत आहे. त्यामुळे सध्या मोठ्या धामधुमीत सुरू असलेल्या विवाह सोहळ्यावर त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. दुपारच्या लग्न समारंभासाठी लग्न मंडपही आता ओस पडू लागले आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून ते सायं. 4 वाजेपर्यंत तीव्र स्वरूपाच्या ऊन्हाचे चटके सोसावे लागत असल्याने या वेळेत सहसा घराबाहेर पडण्याचे प्रत्येकजण टाळू लागला आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास संपन्न होत असणार्या विवाह सोहळ्यास जाण्यास टाळाटाळ केली जाते. यजमानांचे जवळचे नातेवाईक व मित्र परिवार सोडून अन्य मंडळी शक्यतो दुपारी विवाह सोहळ्यास जात नसल्याने दुपारच्या सुमारास विवाह सोहळ्यास तुरळक गर्दी आढळून येत आहे.
सध्या अकवळी पावसाच्या स्थितीमुळे ढगाळ परिस्थितीमुळे तापमानातही वाढ झाल्याने तापमानाने मोठाच उच्चांक गाठला असल्याने वाढत्या उष्णतेचे घशाला कोरड पडणे, थकवा येणे, अंगाची लाही लाही होणे, मोठ्या प्रमाणावर घाम येणे आदी शरीरावर होणारे परिणामही चांगलेच जाणवू लागले आहेत. त्यामुळे उष्णतेचा शरिरावर परिणाम होऊ नये यासाठी प्रत्येकजण काळजी घेताना दिसत आहे.त्यामुळे दुपारच्या वेळेस संपन्न होणार्या विवाह सोहळ्यास एरव्ही दिसणारी गर्दी दिसून येत नाही.