| रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील सहा प्रमुख नद्यांपैकी तीन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदी किनारी राहणाऱ्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
रात्रीपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे नद्या पाण्याने भरून गेल्या आहेत. जिल्ह्यातील महाड येथील सावित्री, कर्जतमधील उल्हास आणि पनवेलमधील गाढी नदीमध्ये इशारा पातळीपेक्षा कमी पाणी असल्याची माहिती जिल्हा प्रशासन दिली आहे. मात्र, रोहामधील आंबा, कुंडलिका आणि खालापूरमधील पाताळगंगा या नद्यांनी धोका पातळी ओलांडली असल्याची माहिती समोर आली आहे. नद्यांच्या जवळ असलेल्या गावांना पुराचा धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे. अन्य ठिकाणी स्थलांतरित व्हावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.







