सात वर्षांमध्ये 1718 जणांचा बळी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अरुंद आणि खड्डेमय रस्ते, नियमांकडे दुर्लक्ष, वाहन चालवताना केलेले मद्यप्राशन आदी विविध कारणांमुळे रायगड जिल्ह्यातील महामार्गासह वेगवेगळ्या रस्त्यावर या वर्षभरात अनेक अपघात झाले. तर गेल्या सात वर्षांमध्ये 5 हजार 241 अपघात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या अपघातामध्ये 1718 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अरुंद व खड्डेमय रस्त्यांमुळे हे अपघात अधिक झाले असल्याचेही समोर आले आहे. तसेच वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविल्याने देखील अपघात झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अलिबाग-वडखळ रस्त्याचे रुंदीकरण करण्यास प्रशासन उदासीन ठरले असून मुंबई-गोवा महामार्गाचे अपुर्ण असलेल्या कामांमुळे देखील अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
रायगड जिल्ह्यात नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात वेगवेगळे उद्योग उभारत असताना पर्यटन देखील वेगात वाढत आहे. महिन्यातून एकदा येणारे पर्यटक रायगड जिल्ह्यात दर आठवड्याला येत आहेत. शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गासह, द्रुतगती महामार्ग, जिल्हा मार्ग व अन्य रस्त्यांवरुन वाहनांची वर्दळ वाढत आहे. दुचाकी वाहनांसह चारचाकी व अन्य वाहनांची संख्याही रस्त्यावर वाढू लागली आहे. मात्र जिल्ह्यातील काही भागातील अरुंद रस्ते, निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम, ठिकठिकाणी असलेले खड्डे तसेच वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालविणे अशा अनेक कारणामुळे जिल्ह्यात अपघात होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मागील तीन वर्षाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात 5 हजारहून अधिक अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये 1718 जणांचा जागीच मृत्यू झाला.
जिल्ह्यातील अपघात रोखण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेमार्फत कारवाई तसेच चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जातो. तरीदेखील वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणारे महाभाग जिल्हयात आजही आहेत. या बेशिस्त चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून केला जात आहे.
जिल्ह्यातील अलिबाग-वडखळ हा महत्वाचा रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावरून हजारो वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमच आहे. त्यात खड्डे चुकविताना अपघात होण्याच्या घटनाही घडत आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत प्रशासन उदासीन ठरले आहे. त्यामुळे पडलेल्या खड्ड्यातून वाहन चालविण्याची वेळ चालकांवर येत आहे. काही वाहन चालक त्यांच्या निश्चित स्थळी लवकर जाण्याच्या नादात वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवितात. त्याचा फटका अनेक वेळा अपघातातून बसतो. मुंबई- गोवा महामार्गाचा प्रश्नही गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या मार्गाचे काम संथ गतीने सुरु असल्याने प्रवास करताना चालकांना व प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. या मार्गावर अनेक वेळा अपघात झाले आहेत. जिल्ह्यातील वाढत्या अपघातामुळे अनेक कुटूंबाना कुटूंब प्रमुख गमवावा लागत आहे.
3 हजार 862 जणांना कायमचे अपंगत्व
रायगड जिल्ह्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातामध्ये 3 हजार 862 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. यामध्ये त्यांना कायमचे अंपगत्व आल्याची माहिती समोर येत आहे. नोव्हेंबरपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये 991 अपघात झाले असून 613 गंभीर जखमी झाले. तसेच 2020 मध्ये 596 अपघातात 409 गंभीर जखमी, 2021 मध्ये 688 अपघातात 379 गंभीर जखमी, 2022 मध्ये 724 अपघातात 689 गंभीर जखमी तर 2023 मध्ये 700 अपघात झाले. त्यात 593 जण जखमी झाले आहेत. 2024 मध्ये 732 अपघात झाले असून 616 जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच 2025 मध्ये 594 अपघात झाले. त्यात 563 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
आमदारांचे आश्वासनाचे गाजर
अलिबाग, मूरुड व रोहा मतदार संघाचे आमदार दळवी यांनी निवडणूकीपुर्वी रस्ता स्व खर्चाने करून देणार असे आश्वासन दिले होते. परंतु, सात वर्षे होत आली आहेत. मात्र, अद्यापर्यंत अलिबाग- रोहा हा रस्ता अपुर्ण अवस्थेत आहे. या मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. पावसाळ्यात चिखलातून आणि उन्हाळा, हिवाळ्यात धुळ खात प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. आमदारांकडून फक्त आश्वासनाचे गाजर दाखविल्याची प्रतिक्रीया उमटत आहे.
नोव्हेंबर अखेरपर्यंतच्या आकडेवारीवर दृष्टीक्षेप
| वर्षे | दाखल अपघात | फेटल(मयत) | गंभीर जखमी |
| 2019 | 991 | 216 | 613 |
| 2020 | 596 | 206 | 409 |
| 2021 | 688 | 236 | 379 |
| 2022 | 724 | 276 | 689 |
| 2023 | 700 | 281 | 593 |
| 2024 | 732 | 273 | 616 |
| 2025 | 594 | 230 | 563 |
| एकूण | 5241 | 1718 | 3852 |
