‘इंडिया’ आघाडीत ‘वंचित’ची भूमिका महत्वाचीः सुप्रिया सुळे

| मुंबई | वृत्तसंस्था |

राज्यात महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून केवळ शिक्कामोर्तब होण बाकी आहे. इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भूमिका महत्वाची राहणार आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. देशाच्या समाजकारणात आंबेडकर कुटुंबीयांचे मोठे योगदान आहे. संविधान आणि देश वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांची गरज आहे. नव्या पिढीला त्यांनी मार्गदर्शन करावे. संविधानासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रीपदाची जबाबदारी संभाळण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. ते गृहमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. पोलिस अधिकाऱ्यांच्या सातत्याने बदल्या करण्यात येत आहेत. त्यांना पारदर्शकपणे काम करु दिले जात नाही. गेल्या 15 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गुन्हेविषयक नवं विधेयक मांडले आहे. ज्यामध्ये फोन टॅपिंग अधिकृत करण्यात आले आहे, याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
महाराष्ट्रातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेले जात आहेत. गुंतवणूक होत नाही. हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. यावर महाराष्ट्रातील ट्रीपल इंजिन सरकार गप्प आहे. खोके सरकारकडे 200 आमदार असूनही महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायावर कोणीही बोलत नाही, अशी टीका सुळे यांनी केली.

जगभरातील अनेक देशांमध्ये 2024 मध्ये निवडणुका होणार आहेत. आपल्या देशातील निवडणुका पारदर्शकपणे आणि कोणत्याही दडपशाही विना पार पडल्या पाहिजेत. हे वर्ष सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचं वर्ष आहे. मतदान यंत्राबाबत विदेशात शंका घेतल्या जात असतील तर मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावून यावर बोलायला हवे. ते फक्त भाजपचे नाहीत तर देशाचे पंतप्रधान आहेत. कॉपी करुन पास होण्यापेक्षा अभ्यास करुन पास झालेले केव्हाही चांगले असते, असा टोलाही मतदान यंत्रावरुन सुळे यांनी लगावला.

Exit mobile version