बुलढाण्यातील संभाजी ब्रिगेडच्या जिल्ह्याध्यक्षांसह, विभागीय अध्यक्ष शेकापक्षात

आ. जयंत पाटील यांनी केले स्वागत
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बुलढाणा जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. संभाजी ब्रिगेड माजी जिल्हा अध्यक्ष ढाकळखेड-वायाळचे सरपंच रामेश्‍वर वायाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी या कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बुलढाणा जिल्हा चिटणीस अ‍ॅड. दत्ता भूतेकर यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग येथे शेतकरी भवनमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला. संभाजी ब्रिगेड माजी जिल्हा अध्यक्ष ढाकळखेड-वायाळचे सरपंच रामेश्‍वर वायाळ यांच्यासह अण्णा हजारे यांचे सहकारी तथा पत्रकार प्रा.दिलीप नाईकवाड (दुसरबीड), संभाजी ब्रिगेडचे विभागीय उपाध्यक्ष रमेश ढगे, शिवशंकर शेळके यांचाही यात समावेश आहे. शेतकरी कामगार पक्ष आणि आ. जयंत पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्‍वास ठेवून आपण हा प्रवेश करीत असल्याचे यावेळी रामेश्‍वर वायाळ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सांगितले. बुलढाणा जिल्ह्यात शेकापक्षाची ताकद वाढवून शेतकरी, कष्टकरी जनतेसाठी काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version