संजय जांभळे लढवय्ये उमेदवार : जयंत पाटील

| गडब | प्रतिनिधी |

वडखळ जिल्हा परिषद गटात जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला असून, पुढेही तोच लढा कायम ठेवणार असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी वढाव येथील प्रचारसभेत केले. लोकहित जपणारे आणि जनतेच्या अडीअडचणी, सुखदुःखात धावून जाणारे संजय जांभळे यांसारखे लढवय्ये उमेदवार जिल्हा परिषदेत पाठवा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. ते गुरुवार, दि. 5 फेब्रुवारी रोजी पेण-वढाव येथे झालेल्या सभेत बोलत होते.

एसईझेडचा लढा, एमआयडीसी 11 गावांचा संघर्ष, शेतकरी-कष्टकरी समाजासाठी उभारलेले आंदोलन यांची आठवण करून देत जयंत पाटील म्हणाले, सत्तेसाठी पक्षांतर करणारे नेते आपण पाहिले; मात्र रायगड जिल्ह्यात शेकाप आणि काँग्रेस या दोन पक्षांनी विचारधारा न बदलता जनतेसाठी भूमिका घेतली. संविधान आणि लोकशाही मूल्ये जपत जनतेला न्याय देण्याचे काम या पक्षांनी केले आहे. आज मात्र शेतकऱ्यांना देशोधडीला लावून, स्थानिकांना विश्वासात न घेता निर्णय घेणाऱ्या आणि भांडवलदारांचे हित जपणाऱ्या भाजपासारख्या पक्षांना येथे थारा देऊ नका. खारेपाटातील मतदारांनी शेकापचा सच्चा नेता आणि नेतृत्व म्हणून संजय जांभळे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे ते म्हणाले.

या प्रचारसभेला वडखळ जिल्हा परिषद गटातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार संजय जांभळे, वडखळ गणातील शेकापच्या उमेदवार ललिता म्हात्रे, वाशी गणातील काँग्रेसचे उमेदवार वैभव म्हात्रे उपस्थित होते. यावेळी काँग्रेस आमदार भाई जगताप, शेकाप खजिनदार अतुल म्हात्रे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अशोक मोकल, शेकाप चिटणीस महेंद्र ठाकूर, दादर गटाचे उमेदवार व शेकाप पेण तालुका चिटणीस प्रल्हाद दिनेश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते दिपक पाटील, शेकाप माजी सभापती सुनंदा म्हात्रे तसेच शेकाप, काँग्रेस, शिवसेना महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार भाई जगताप यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर टीका करताना पंचायत राज व्यवस्थेतून नागरिकांना मिळालेले अधिकार हे संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आले असल्याचे सांगितले. काँग्रेस व शेकापने पूर्वी केलेल्या जनआंदोलनांमुळे शेतकरी, कष्टकरी, कामगारांना न्याय मिळाला. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंचायत राज व्यवस्था सक्षम झाली; मात्र सध्याचे सरकार ती व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कणखर नेतृत्व आवश्यक असून संजय जांभळे, वैभव म्हात्रे आणि ललिता निलेश म्हात्रे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

शेकाप पेण तालुका प्रमुख नेते अतुल म्हात्रे यांनी रोजगार मेळावे, महिला बचत गटांसाठी उपक्रम आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. काँग्रेसचे अशोक मोकल यांनी भाजप नेत्यांवर खोटे बोलून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करत टीका केली. एकूणच, शेकाप, काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या या प्रचारसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले असून, ती उमेदवारांसाठी लाभदायक ठरणार असल्याची चर्चा आहे.

Exit mobile version