समग्र शिक्षा आंदोलनाचा 57वा दिवस; सरकारला प्रतीक्षा आंदोलनकर्त्यांच्या मरणाची
| रायगड | प्रतिनिधी |
प्रगतीशील महाराष्ट्रात महिला पहिल्यांदाच मुंडण करणार करणार असून, ही स्थिती खुद्द राज्य सरकारने शिक्षण विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आणली आहे. दि.9 मार्चपासून राज्यातील समग्र शिक्षा अभियानाचे 3 हजारापेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी आंदोलन करत असून, यापूर्वी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दि.20 एप्रिल रोजी पुरुषांनी मुंडण आंदोलन केले आहे. आमच्या मृत्यूनंतर सरकार दखल घेणार का? असा प्रश्न आझाद मैदानावर आंदोलनाला बसलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सरकारला विचारला आहे.
मागील 20 ते 25 वर्षांपासून शासन सेवेत कायमच्या प्रतीक्षेत असलेले समग्र शिक्षा अभियानाचे 3 हजारांवर कर्मचारी दि.9 मार्चपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण आणि अन्नत्याग आंदोलन करत आहे. त्यात महिला कर्मचाऱ्यांचा देखील समावेया आहे. विशेष म्हणजे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत दिव्यांग विभागातील अर्ध्या कर्मचाऱ्यांना 2024 मध्ये सेवेत नियमित करण्यात आले. एकाच अभियानातील अर्धे कर्मचारी कायम व सेवाजेष्ठ कर्मचारी कंत्राटी असल्याने राज्यात असंतोषाचे वातावरण आहे. सन 2001 पासून समग्र शिक्षा अभियान सुरू झाले. त्याच वेळी विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण व शिक्षकांना मार्गदर्शन व्हावे यासाठी विषयसाधन व्यक्ती, विशेष शिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, लेखा, एमआयएस कोऑर्डिनेटर, इंजिनिअर, जिल्हा समन्वयक, सहायक कार्यक्रमाधिकारी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विविध पदावर असणारे कर्मचारी अशी अनेक पदे सहा-सहा महिन्यांच्या करारावर व मानधन तत्त्वावर भरली गेली होती. गत 20 ते 25 वर्षांत प्रत्यक्ष सेवेदरम्यान तब्बल 257 कर्मचारी विविध कारणांने मृत्यूमुखी पडले आहेत.
त्यामुळे देशात लाडक्या बहिणी व महिला आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना प्रगतीशील महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आपल्या रास्त मागण्यासाठी 56 दिवस उपोषण व इतर आंदोलन करावे लागत आहे. उन्हाच्या तडाख्यात 56 दिवसाच्या आंदोलनानंतर सुद्धा एकाही मंत्र्याने दखल घेतली नसल्याने नाईलाजाने कर्मचाऱ्यांनी महिला मुंडण आंदोलनाचा इशारा दिला आहे. दि.7 मेपर्यंत सरकारने नियमित करण्यासंदर्भात ठोस निर्णय न घेतल्यास दि.8 मे रोजी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सर्व महिला कर्मचारी मुंडण करणार असल्याचे निवेदन शासनास सादर केले आहे.
आंदोलनाचे 56 दिवस
सरकारचे लक्ष आपल्या मागणीकडे वेधण्यासाठी कधी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री यांचेकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली. कधी रस्ता रोको, वृक्ष चढाई, थाळीनाद, पुरुषांचे मुंडण आंदोलन तर कधी गाण्यांच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचे काम केले. 56 दिवसांत अनेक खासदार, आमदार, विविध पक्ष व संघटनाचे नेते आझाद मैदानावर आले. परंतु, मंत्रिमंडळातील एकही मंत्री आझाद मैदानावर फिरकले नाही हे विशेष.
मुख्यमंत्र्यांनीही केले नेतृत्व
विरोधी पक्षात असताना भाजपमधील सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस यांनी 2008 पासून समग्र शिक्षा आंदोलनाचे नेतृत्व करत तत्कालीन सरकारवर आसूड ओढले. आमची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये कायम करण्याचे अभिवचन 2012 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 2025 मध्ये हिवाळी अधिवेशन आंदोलन दरम्यान स्वतः मुख्यमंत्री यांनी कर्मचाऱ्यांचे उपोषण सोडण्यासाठी आश्वासन दिले आहे.






