। महाड । प्रतिनिधी ।
तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबिवली बुद्रुक येथील सरपंच प्रतिमा प्रकाश गायकर यांना ग्रामपंचायत निधीचा स्वतःच्या फायद्याकरिता वापर करून गैरव्यवहार केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दोषी ठरवले असून, त्यांचे सरपंचपद व सदस्यत्व रद्द केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार ग्रामआरोग्य, पोषण, पाणीपुरवठा समितीची सदस्य व सचिव अंगणवाडी सेविकांऐवजी अशा स्वयंसेविका राहतील व समितीचे अध्यक्ष सरपंच राहतील अशी तरतूद असताना गायकर यांनी ग्राम, आरोग्य व पोषण पुरवठा स्वच्छता समितीची 12 नोव्हेंबर 2019 रोजी सभा घेऊन त्यामध्ये ग्रामआरोग्य व पोषण पुरवठा व स्वच्छता समितीच्या सचिवाच्या सहीचे अधिकार अंगणवाडी सेविकेला देण्याबाबत ठराव केला.
हा ठराव महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाला अनुसरून नसल्याचे निदर्शनास आले. सदर ठरावानुसार 27 डिसेंबर 2019 रोजी सरपंच गायकर यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा महाड येथे बँक खात्यात नियमबाह्यपणे बदल करून दि. 1 जानेवारी 2020 रोजी धनादेश क्रमांक 42843 याद्वारे रक्कम रुपये 15 हजार 549 स्वतःच्या नावे काढून ती खर्च केली.
सदर देयके संबंधितांना धनादेशाद्वारे अदा न करता स्वतः सेल्फ धनादेशाने काढून खर्च केल्याने यामध्ये गैरव्यवहार दिसून येत होता. ग्रामपंचायत सदस्य संदीप रमेश खिडबिडे यांनी याबाबत आक्षेप घेऊन सौ. गायकर यांच्या विरोधात गैरव्यवहाराचा आरोप केला आणि त्या दृष्टीने पाठपुरवठा सुरू केला. त्यानुसार विभागीय आयुक्त कोकण विभाग न्यायालयाद्वारे फिर्यादी संदीप रमेश खिडबिडे यांच्या पुराव्यानुसार मुंबई अधिनियम 1959 क्रमांक 3 व कलम 39 एक अन्वये प्रतिमा गायकर यांना दोषी ठरवून त्यांचे सरपंचपद त्याचप्रमाणे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय दिला.
या निर्णयाविरोधात प्रतिमा प्रकाश गायकर यांनी ग्रामविकास मंत्रालय येथे दाद मागितली असता तिथे त्यांच्या बाजूने निर्णय देण्यात आला; परंतु याविरोधातदेखील संदीप खिडबिडे यांनी अॅड. शशांक मांगले यांच्यातर्फे पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली असता तेथे कोकण विभागीय आयुक्त न्यायालयाचा आधीचा निकाल व पुरावे ग्राह्य धरण्यात येऊन त्या निकालानुसारच उच्च न्यायालय न्यायाधीश एन.जे. जमादार यांनी सरपंच गायकर यांना दोषी ठरवून त्यांचे सरपंच व सदस्यत्व रद्द केले असल्याचा निकाल 6 एप्रिल 2023 रोजी पारीत केला आहे. या निर्णयामुळे आता परिसरात मात्र एकच खळबळ उडाली आहे.