काँग्रेसने डागली तोफ
नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
शरद पवार आणि ममता बॅनर्जींमधील भेट म्हणजे पूर्वनियोजित कट आहे. देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला कमकुवत करण्याचा हा प्रयत्न आहे. तसंच ममता बॅनर्जी या भाजपला ऑक्सिजन पुरवत आहे, असा गंभीर आरोप लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी केला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बुधवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेससह राहुल गांधींवर निशाणा साधला. काय आहे यूपीए? यूपीए कुठेही नाहीए? असं म्हणत ममतांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तर विदेश दौरे होत असल्याने प्रत्यक्षात जमिनीस्तरावर काम होत नाहीए. मग भाजपचा पराभव कसा होणार? असा सवाल करत ममतांनी राहुल गांधींनाही लक्ष्य केले.
मतांनी केलेल्या हल्ल्याला आता काँग्रेसही जशास तसे उत्तर देणार आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बुधवारी रात्री महत्त्वाची बैठक झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये काल रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकीत ममतांवर जोरदार हल्ला करण्याचा निर्णय झाला, असे सूत्रांनी सांगितले.
ममता बॅनर्जींनी काँग्रेस आणि राहुल गांधींना हल्लाबोल केल्यानंतर काँग्रेसनेही पलटवार केला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी ममतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस शिवाय यूपीए म्हणजे आत्मान नसलेलं शरीर आहे. यामुळे ही वेळ वाद घालण्याची नाही, तर एकजूट होण्याची आहे, असे सिब्बल म्हणाले. सिब्बल यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
सामाजिक आणि राजकीय अशा सर्व मुद्द्यांवर आम्ही तृणमूल काँग्रेसचा समावेश करण्याचा प्रयत्न करतोय. विरोधकांमध्ये फूट पडण्याची आणि आपल्यातच लढण्याची ही वेळ नाही. भाजपविरोधात एकजूट होऊन लढायचं आहे,
मल्लिकार्जुन खर्गे ,काँग्रेसचे वरिष्ठ नेते.
काँग्रेसवरील ममतांच्या टीकेला खर्गे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमचे नेते राहुल गांधी हे प्रत्येक मुद्द्यावरून सरकारला घेरत आहेत. शेतकर्यांच्या मुद्द्यांसाठी कोण लढतंय? महागाईसाठी कोण लढतंय? यूपीत जिथे घटना घडल्या तिथे जाऊन प्रियांका गांधी लढत आहेत. शेतकर्यांसाठी त्या लढत आहेत. प्रत्येक मुद्द्यावर आम्ही लढत आहोत. आम्ही लढलो नसतो तर इतक्या राज्यांमध्ये आमचे सरकार आले नसते. आमच्याबद्दल असे वक्तव्य खपवून घेणार नाही, असे खर्गे म्हणाले.