सोलापूर | वृत्तसंस्था |
देशात सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा उच्चांक नोंदविणारे शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव अण्णासाहेब देशमुख यांचे सोलापुरातील खासगी रुग्णालयात शुक्रवार ३० जुलै रोजी निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सांगोला दौऱ्यावर आहेत, दिवंगत माजी आमदार गणपराव देशमुख यांच्या कुटुंबीयांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली व त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गणपतरावांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांना श्रद्धांजली अपर्ण केली.
”लोकांसाठी झटणारा माणूस हरपला. लोकांच्या प्रश्नांबद्दल अतिशय चिंता आणि त्यातला त्या महाराष्ट्रातील दुष्काळी भाग पिण्याच्या व शेतीचा पाण्याचा प्रश्न जिथे भेडसावतोय, त्यासाठी अखंड चिंता आणि चिंतन या दोन्ही गोष्टी गणपतपरावांचं वैशिष्ट होतं. १९६२ मध्ये ते सर्वप्रथम महाराष्ट्राच्या विधानसभेत आले, मी १९६७ मध्ये आलो माझ्या अगोदर पाच वर्षे ते आले. १९६७ नंतर जवळपास एक किंवा दोनदा काहीतरी खंड पडला, ते सलगपणे महाराष्ट्राच्या विधानसभेत होते. ग्रामीण भागातील जीवन सुखकर व्हावं यासाठी ते कायम आग्रही होते. त्यांच्या इतका स्वच्छ, चारित्र्यसंपन्न असा नेता असणं हे महाराष्ट्राचं भाग्य होतं,” असे यावेळी शरद पवार म्हणाले.
पुढे मंत्रिमंडळातील आठवण सांगत ते म्हणाले, मला एका गोष्ट आठवते की माझ्या मंत्रिमंडळात ते कृषि विभागाचे मंत्री होते, पण त्या अगोदर जेव्हा मंत्रिमंडळ करायचं होतं त्यावेली डी बी पाटील व गणपतराव देशमुख यांची नावं, शेकाप पक्षाच्या तीने घेतली गेली आणखी एकजण कुणीतरी होतं. पण त्यावेळी सतत गणपतरावांचा आग्रह होता की मला नका करू, रायगड जिल्हा हा शेकापचा एक महत्वाचा जिल्हा आहे आणि तिथं दत्ता पाटील म्हणजेच डी बी पाटील हे अतिशय प्रभाव असलेली व्यक्ती आहे, त्यामुळे त्यांनाच ही जागा दिली जावी मला देता कामानये, त्यासाठी तुम्ही त्यांचाच विचार करा, हा आग्रह शेवटपर्यंत गणपतरावांनी केला. परंतु, आम्ही त्यावेळी १८ मुद्द्यांचा एक कार्यक्रम, सरकार कसं चालवायचं याचा केला होता आणि त्या मुद्य्यांमध्ये जी चर्चा करणारी लोकं बसली होती, त्यामध्ये गणपतरावांचा समावेश होता. गणपतरावांनी एकच गोष्ट सांगितली की, काही झालं तरी ग्रामीण भागातील माणसांना दोन वेळच्या अन्नासाठी झगडायला लागता कामा नये. कष्ट करायचा त्याचा कायदेशीर अधिकार आहे, हे सूत्र आपल्याला आणायचं आहे. त्यासाठी रोजगार हमीचं धोरण या सरकारच्या १८ कलमी कार्यक्रमात सगळ्यात महत्वाचं धोरण आणि हा भाग असला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. म्हणून मंत्रिंडळाची निर्मिती करण्याच विचार आला तेव्हा आम्ही सर्वांनी सांगितलं की रोजगार हमी याबद्दल या सरकारचा आग्रह असेल, तर त्याची अंमलबजावणी करायला, गणपतरावांशी शिवाय आमच्या समोर दुसरा माणूस नाही. म्हणून गणपतरावांनी नाही म्हणायचं सोडून द्यावं. अखेर ते शेवटी ते तयार झाले.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या अगोदर, ‘गणपतराव यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे,’ अशी भावना व्यक्त केली होती.