सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी शशी थरूर यांची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी थरूर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 2014 साली सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. निकालानंतर शशी थरूर यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. गेली 7.5 वर्ष आपण यातना आणि वेदना सहन करत होतो असं त्यांनी म्हटलंय.

दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 17 जानेवारी 2014 रोजी पुष्कर यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता. या प्रकरणात कॉंग्रेसचे खासदार आणि सुनंदा पुष्कर यांचे पती शशी थरूर यांना मुख्य आरोपी बनविण्यात आले होते. थरूर सध्या जामिनावर होते. दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरोधात कलम 8 8-ए (क्रूरता आणि मानसिक छळाचा आरोप) आणि कलम 606 (आत्महत्या करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा गुन्हा) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी दोन्ही बाजूंचे युक्तीवाद एकून घेतल्यानंतर या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी सुनंदा पुष्कर तणाव आणि छळामुळे मानसिक ताणावाखाली होत्या असे सांगितले. तसेच त्यांनी असा युक्तिवाद केला की हा अपघाती मृत्यू नव्हता. शवविच्छदेन अहवालात विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. इंजेक्शनद्वारे हे विष देण्यात आल्याचेही त्यात नमूद होते, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. श्रीवास्तव असेही म्हणाले की सुनंदा यांना यापूर्वी कोणताही आजार किंवा त्रास नव्हता. त्यामुळे हा अपघाती मृत्यू नसून ताणतणाव आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा तसेच मानसिक छळामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले होते.

Exit mobile version