शेतकरी कामगार पक्षाला निवडणुकीत कमी-अधिक यश मिळाले असेल. पण, आम्ही आमच्या तत्त्वांशी ठाम आहोत. आज फाटाफुटीच्या राजकारणात शेकाप हाच निष्ठेपासून न ढळणारा पक्ष आहे. त्यामुळेच तरुण पिढीही आता आमच्या विचाराकडे येऊ लागली आहे. मला ठाम खात्री आहे की, येणारी पिढी हा प्रागतिक विचारांचा वारसा नक्की जोमाने पुढे नेईल, असा विश्वास शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी पक्षाच्या 76 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केला.
प्रश्न: शेतकरी कामगार पक्ष आपला अमृत महोत्सव साजरा करतोय. केशवराव जेधे, शंकरराव मोरे, क्रांतीसिंह नाना पाटील यांनी 1948 साली स्थापन केलेल्या शेकापने अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहिली. चढ-उतार पाहिले. एक केडरबेस पार्टी, बहुजन, शेतकरी, कष्टकरी समाजाचा पक्ष म्हणून सारा महाराष्ट्र शेकापला ओळखतो. दाजिबा देसाई, एन.डी. पाटील, गणपतराव देशमुख, विठ्ठलराव हांडे, केशवराव धोंडगे, रायगडपुरता बोलायचं तर दि.बा. पाटील, दत्तुशेठ पाटील, वाजेकरशेठ, मोहन पाटील, दत्ता पाटील आणि प्रभाकर पाटील, या सर्वांचं राजकारण, काम करण्याची पद्धत आपण जवळून पाहिली आहे. आज गेली अनेक वर्षे आपल्या खांद्यावर शेकापची धुरा आहे. आपले अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि आक्रमकपणा, आपली धावपळ, तळमळ सगळ्यांनाच भावते. मागे वळून पाहताना काय वाटतं?
उत्तर: शेतकरी कामगार पक्षाची स्थापना ही काँग्रेसमधूनच झाली. स्वातंत्र्यानंतर जेव्हा काँग्रेसमधीलच, जे डाव्या विचारसरणीचे मान्यवर होते, त्यांना असं वाटू लागलं की, काँग्रेसमध्ये राहून आपल्याला गोरगरीबांची कल्याणकारी कामे करणे शक्य नाही, किंबहुना काँग्रेस हा आता सरंजामशाहीकडे वळू लागलाय. त्यावेळी केशवराव जेधे, शंकरराव मोरे, क्रांतीसिंह नाना पाटील, भाऊसाहेब राऊत आदी मंडळींनी डाव्या विचारांवर आधारित असा पक्ष काढायचे ठरविले आणि शेतकरी कामगार पक्षाचा जन्म झाला. राज्यामध्ये ज्या ज्यावेळी शेतकरी, कामगार आणि कष्टकरी जनतेवर अन्याय झाला, त्या त्यावेळी शेकापने संघर्ष केला आणि न्याय मिळवून दिला. गेली 75 वर्षांपासून आजतगायत, आम्ही प्रस्थापित समाजव्यवस्था असो की शासनव्यवस्था असो, संघर्षच करीत आलो आहोत. आम्हाला निवडणुकीत कदाचित हवे तेवढे यश नसेल मिळाले, पण तरीही आम्ही सत्तेसाठी आमच्या विचाराशी कधीही तडजोड करत नाही. आमची बांधिलकी सत्तेशी नसून, गोरगरीब जनतेशी आहे. गेली 75 वर्षे आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत. आणि आम्हाला त्याचा अभिमानही आहे. आम्ही कधीही राजकारणाचा विचार करून प्रश्न हाती घेत नाही, त्यामुळे निवडणुकीत यश मिळो अगर न मिळो, आम्ही आमचा डाव्या विचारांसाठी घेतलेला वसा कधीही टाकणार नाही. रायगडपूरता बोलायचे तर, आम्ही दिलेला नवी मुंबईचा लढा, विमानतळाचा किंवा अगदी जेएनपीटी पोर्टचा लढा, आरसीएफविरोधातला लढा किंवा सध्या ऐरणीवर असलेला Navi Mumbai Airport Influence Notified Area (NAINA) असो, भातशेतीमध्ये पडलेल्या खोडकिड्याचा प्रश्न असो, की मिठागरांचा प्रश्न असो, की सेझचा प्रश्न असो, आजवर फक्त आणि फक्त शेकापनेच संघर्ष करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. एकदा भूमिका घेतली की न्याय मिळेपर्यंत शेवटपर्यंत आम्ही आमचा लढा चालूच ठेवतो. आणि म्हणूनच आजही महाराष्ट्रातला शेतकरी आमच्यावर भरवसा ठेवून असतो.
प्रश्न: असं म्हटलं जातं की शेकापचा उद्योगांना किंवा विकासकामांना विरोध असतो. नवी मुंबई विमानतळ, आरसीएफ प्रकल्प यांना विरोध केला आणि नंतर विरोध मावळला. असं का होते?
उत्तर: शेतकरी कामगार पक्षाचा कधीही उद्योगांना किंवा विकासकामांना विरोध नव्हता आणि भविष्यातही नसणार आहे. आमचा विरोध आहे तो, शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना योग्य तो भाव न देता, गरीब शेतकऱ्यांना केवळ धाकदडपशाही दाखवून, सरकारी दंडेलशाही जी चालते, त्याला आमचा विरोध आहे. सिडकोच्या माध्यमातून जेव्हा नवी मुंबई आणि न्हावाशेवा पोर्टसाठी जमीन अधिग्रहणाचा विषय झाला, त्यावेळी शेतकऱ्यांना मातीमोल किमतीने जमिनी द्याव्या लागल्या असत्या. शेकापने त्यासाठी लढा उभारला, जासई नाक्यावर झालेल्या गोळीबारात अनेक शेतकरी शहीद झाले. विधिमंडळ आणि रस्त्यावर जेव्हा हा प्रश्न अगदी ऐरणीवर आला आणि शेकापने शासनाचे नाक दाबले, तेव्हा कुठे शासन शेतकऱ्यांच्या दबावापुढे झुकले आणि देशात अभूतपूर्व असा साडेबारा टक्क्यांचा विकसित जमीन देण्याचा करार झाला. अगदी तेच नवी मुंबई विमानतळाबाबतीत झाले. इथे तर आता बावीस टक्के विकसित जमिनीचा करार झाला. शेकापने हे लढे दिले नसते, तर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नसता, हे सत्य शेकापचे विरोधकही कबूल करतात. आरसीएफच्या बाबतीत बोलायचे तर तिथेही तेच. आरसीएफमध्ये जेवढे प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक नोकरीला लागले, तेवढे कुठल्याही प्रकल्यात लागले नाही, हे शेकापच्याच लढ्याचे यश आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीने घ्यायच्या आणि नंतर त्या जमिनी बिल्डर आणि विकासकांच्या घशात घालायच्या हे षङ्यंत्र आम्ही, पक्ष म्हणून कधीही खपवून घेणार नाही. शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही ठामपणे उभे आहोत म्हणूनच तर आमची विश्वासार्हता आजही टिकून आहे.
प्रश्न: आपण म्हणतो की भाजप छोटे पक्ष फोडतो वगैरे. पण, आजवरचा अनुभव लक्षात घेता काँग्रेसनेही तेच केले. पश्चिम महाराष्ट्रातील शेकापचे दिग्गज नेतेमंडळींना वेगवेगळी आमिषे दाखवून काँग्रेसनेही तेच केले. थोडक्यात, मोठा मासा छोट्या माशाला खातो हेच खरं. डावे पक्ष, मग ते शेकाप असो, मार्क्सवादी असोत की अगदी विदर्भातील फॉरवर्ड ब्लॉक्स, लाल निशाणसारखे छोटे पक्ष असो, पद्धतशीरपणे संपविले गेले. काय वाटतं आपल्याला?
उत्तर: हे लक्षात घ्या की, कुठलाही पक्ष जो विचारावर, ईझमवर आधारित आहे, तो पक्ष कधीही संपत नसतो. त्याचा जनाधार कदाचित कमी होईल; परंतु त्या पक्षाचा विचार कधीही संपणार नाही. जी नावे वर घेतली आहेत, ते पक्षही आज तितक्याच ताकदीने उभे आहेत. हा विचाराचा संघर्ष आहे. वर्गविरहित, शोषणविरहित समाजरचना, भांडवलशाहीला विरोध, गोरगरीबांचे कल्याण, हा विचारांचा गाभा ज्यावेळी नष्ट होईल, त्या समाजात गरीबांना, पद्दलितांना, कष्टकऱ्यांना पद्धतशीरपणे भरडले जातील. आणि म्हणून समाजात डाव्या विचारसरणीच्या पक्षांची नितांत गरज आहे. हां, हे खरं आहे की शेकापने ज्यांना मोठे केले, जे राजकारणात कधीही उच्च पदावर येऊ शकले नसते, असे काहीजण केवळ स्वार्थापायी इतरत्र गेले. जे गेले त्यांना त्यांची पदे लखलाभ होवो. शेकापसारख्या डाव्या विचारसरणीमधून, चक्क यु टर्न घेऊन उजव्या विचारसरणीत जे गेले त्यांच्या विचारसरणीबद्दल काय बोलावे?
प्रश्न: शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा आपला दांडगा अभ्यास आहे. ओला आणि सुका दुष्काळ तर महाराष्ट्राच्या पाचवीलाच पुजलेला असतो. कापूस, कांदा, ज्वारी, बाजरी अशा पिकांसाठी नुकसान भरपाई जाहीर केली जाते. परंतु ती तटपुंजी असते, शिवाय वेळेवर मिळतच नाही. अशा वेळी शेकापची भूमिका फार महत्त्वाची असते. काय वाटते आपल्याला?
उत्तर: शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न गेली कित्येक वर्षे तसेच आहेत. या प्रश्नांचा वर्गवारी करून कायमस्वरूपी तोडगा निघायला हवा. ओलिताखालच्या जमिनींचे प्रश्न वेगळे, कोरडवाहू जमिनींचे वेगळे, कोकणातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे नि घाटावरच्या शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे. कोरडवाहू शेतकरी हा अवकाळी पावसामुळे असो की अवर्षणामुळे असो, आज पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. लहरी निसर्गामुळे दरवर्षी तो नुकसानीतच असतो. अशावेळी शेतकरीराजाला शासनदरबारी तटपुंजा मदतीसाठी याचकाच्या भूमिकेत उभे राहावे लागते. पीक विमा पद्धत अजून सुलभ आणि शेतकरीभिमुख केली पाहीजे. विमा कंपन्यांचे अडवणुकीचे धोरण थांबले पाहिजे. आज सरकारी धोरणामुळे खताच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत. वाढती मजुरी, बोगस बियाणे यासारख्या समस्यांमुळे शेती कसणे हा हातबट्ट्याचा व्यवहार झाला आहे. आमचा रायगड एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जायचा… आज काय परिस्थिती आहे? मान्य आहे की, वाढत्या नागरीकरणामुळे आणि कारखानदारीमुळे उरण, पनवेल आदी भागांतील शेती नष्टच झाली आहे. कोकणात इतरत्र तर केवळ जमिनी कसणे परवडत नाही म्हणून जमिनी कसण्याचेच बंद झाले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वव्यापी लढा उभारण्याचे काम आता आम्हालाच हाती घ्यावे लागणार आहे.
प्रश्न: आज महाराष्ट्रात बेरोजगारी, महागाई, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या, कारखानदारीही अडचणीत, त्यामुळे बेकारीही वाढतेय… या आणि अशा अनेक समस्यांनी सामान्य नागरिक बेजार झालाय. वाढत्या नागरीकरणामुळे पिण्याच्या पाण्याची, सांडपाण्याची आणि पर्यायाने पर्यावरणाची समस्या अशा अनेक समस्या असताना राजकारणी मात्र खेळ खेळताहेत. कसं वाटतं आपल्याला?
उत्तर: खरं तर, राजकारणाच्या या खेळाबद्दल न बोललेलंच बर, इतका उबग आला आहे. आज महागाई दिवसागणिक वाढत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर यांचे भाव पद्धतशीरपणे वाढवले जात आहेत. भाज्या, फळे, कडधान्ये, तृणधान्य यांचीही तीच अवस्था आहे. सामान्य नागरिकांना महिन्याचे बजेट भागवताना नाकी नऊ येते आहे. नवनव्या करपद्धतीमुळे कारखानेही हळूहळू तोट्यात जाताहेत, परिणामी बेकारी वाढते आहे. अशावेळी सामान्य माणसाच्या या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी राजकारणी मात्र आपापला सत्तेचा खेळ खेळत आहेत. सगळंच चित्र पुरोगामी महाराष्ट्राला लाजीरवाणं आहे, हे मात्र खरं! या सत्तासंघर्षाचा सामान्य नागरीकालाही आता कंटाळा आला आहे. एक लक्षात घ्या, की जनता हा सारा खेळ उघड्या डोळ्याने, हताशपणे शांतपणे पाहात आहे. महाराष्ट्रातील जनता आता निवडणुकीची वाट बघते आहे. येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीत जनताच आता या खेळाडूंना कठोरपणे जाब विचारेल आणि मला खात्री आहे, यातूनही काहीतरी चांगले घडेल आणि आज मूकपणे, असहाय्यपणे पाहणारी जनताच मतपेटीद्वारे हे चांगले घडवेल.
प्रश्न: रायगडमध्ये वाढत्या नागरीकरणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यावर आपण काय सांगाल?
उत्तर: आज पनवेल, उरण हा भाग सिडकोच्या माध्यमातून विकसित झालाय. तिथे एक प्लान्ड सिटी म्हणून चांगले काम केले आहे. परंतु, तरीही वारेमाप केलेल्या भरावामुळे, उरण, जुने पनवेलसारखी जी जुनी शहरे आहेत त्यांना मात्र सांडपाणी, पावसाच्या पाण्याचा निचरा, ट्रॅफीक, अरूंद रस्ते यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. आता पेण, अलिबागसारख्या शहरांनाही या समस्या भेडसावत आहेत. विधिमंडळामध्ये मी यावर बोललोही आहे, की जुन्या शहरालगतची जी गावे आहेत, त्या गावांचा डेव्हलपमेंट प्लॅन बनवायला हवा, जेणेकरून तिथे रूंद रस्ते, सांडपाण्याची गटारे आदी सुविधा करता येतील. अलिबागसारख्या शहरात आज ट्रॅफीकची समस्या प्रकर्षाने भेडसावते आहे. पावसाळ्यामध्ये ज्यावेळी अतिवृष्टी आणि समुद्राला भरती असते, तेव्हा अवघे शहर जलमय होते. यासाठी अलिबागमध्ये भूयारी गटार योजना लवकरात लवकर कार्यान्वित होणं गरजेचे आहे. नवीन प्लॅन मंजूर करताना पार्किंगची सुविधा असायलाच हवी, याही नियमाचे तंतोतंत पालन होणे गरजेचे आहे. याबाबतीत मला असे वाटते की, शासनाचे टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे त्यांनी शहराचे प्लॅनिंग करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले पाहिजे.
प्रश्न: अवघा रायगड जिल्हा हा आता पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येतोय. पर्यटनासाठी चांगली संधी आहे, तशाच समस्यादेखील आहेत. काय वाटतं आपल्याला?
उत्तर: रायगड जिल्हा पूर्वी भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध होता. त्यानंतर आरसीएफ, आयपीसीएल, इस्पात या कारखान्यांमुळे रायगड एक औद्योगिक जिल्हा म्हणून नंतर ओळखला जाऊ लागला. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, दिवेआगार या समुद्रकिनाऱ्यांमुळे आता पर्यटनाच्या चांगल्या संधी आता उपलब्ध आहेत. तरीदेखील चांगले रस्ते, चांगली हॉटेल्स, अधिकाधिक मनोरंजनाची साधने या आवश्यक गोष्टींची गरज आहेच. स्थानिकांना रोजगारही चांगला उपलब्ध झाला आहे. चांगले प्रशिक्षित गाईड असणे हीसुद्धा एक गरज बनली आहे. पर्यटनस्थळी स्वच्छतागृह हीसुद्धा एक गरज बनलेली आहे. पुण्या-मुंबईच्या पर्यटकांमध्ये हल्ली ‘फार्म स्टे’ची क्रेज आहे, याचा फायदा स्थानिकांनी घ्यायला हवा.
प्रश्न: मध्यंतरी वाचलं होतं की अलिबाग तालुक्यातील बोडणी येथे मच्छिमारांसाठी अत्याधुनिक बंदर होते आहे. त्याबद्दल काही सांगाल?
उत्तर:आज मोरा, करंजा, रेवस, बोडणीपासून ते अगदी मुरूड, श्रीवर्धन भागातील सर्व मच्छिमार आपली मच्छी मुंबईला ससून डॉकवर नेतात. त्याठिकाणी असलेल्या ठेकेदारांच्या दादागिरीचा या आमच्या कोळी बांधवांना त्रास होतो. म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून बोडणी येथे अत्याधुनिक बंदर बांधले जाणार आहे. तिथे मच्छिसाठी कोल्ड स्टोरेज, वाहतूक व्यवस्था या सुविधा दिल्या जातील. रायगडला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे. उरण, अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन तालुक्यातील सर्व बंदरांलगत पारंपरिक कोळीवाडे वर्षानुवर्षे वसलेले आहेत. आता वाढत्या लोकसंख्येमुळे कोळीवाडे हे अतिगर्दीचे (conjected) झाले आहेत. त्यामुळे आता या कोळीवाड्यांसाठी +4 इतके चटई क्षेत्र देण्यात यावे, यासाठी शासन दरबारी आमचा प्रयत्न आहे. शिवाय, या कोळीवाड्यांसाठी CRZ नियमही शिथील करावा, अशी आमची मागणी आहे.
प्रश्न: आता थोडं राजकीय. शेकापने आजवर अनेक आघाड्या केल्या. कधी शिवसेना कधी राष्ट्रवादी… या आघाड्यांचा फायदा झाला की तोटा?
उत्तर: सध्याचं राजकीय वातावरण हे आघाड्यांचंच आहे. एका पक्षाचेच सरकार ही संकल्पना आता मागे पडली आहे. सर्वसामान्याचं, शेतकरी, कष्टकऱ्याचं हित लक्षात घेऊनच आम्ही आघाड्या केल्या. आमचा पक्ष हा छोटा आहे तरी आम्ही आमच्या डाव्या प्रागतिक विचारावर, भूमिकेवर आजही ठाम आहोत. कुणाशीही आघाडी केली तरी ती राजकीय ॲडजस्टमेंट असते, आम्ही आमच्या भूमिकेपासून कधीही तसूभरही ढळलो नाही. राज्यातील गोरगरीब, पददलित, कष्टकरी जनतेचा कैवार घेण्याची भूमिका आम्ही कधीही बदलणार नाही. सत्ता येईल सत्ता जाईल, आमच्या राजकारणाचा केंद्र हे सामान्य माणसाचे कल्याण असेल हे अगदी निक्षून सांगतो. आम्ही निरनिराळ्या आघाड्या केल्या तरी त्या कधीही स्वार्थासाठी केल्या, काही आमिषाला बळी पडून केल्या, असं आमचा शत्रुही म्हणणार नाही. ज्या पक्षासोबत आम्ही आघाडी केली, ती आघाडी आम्ही अगदी प्रामाणिकपणे निभावली. कदाचित आमचा हाच प्रामाणिकपणा हा आम्हाला तोटा देऊन गेला असेल, पण आम्ही नेहमीच शब्दाला जागलो, दिलेल्या वचनाशी कधीही गद्दारी केली नाही. भांडलो ते समोरासमोर, पाठीत वार करण्याची आमची परंपरा कधीही नाही आणि यापुढेही कधी नसेल, हे अगदी निक्षून सांगतो.
प्रागतिक आघाडी कशासाठी? प्रश्न: सध्या शेकापची आगामी राजकारणाची दिशा का आहे? उत्तर: प्रागतिक आघाडी (Progresive front) राज्यातील बरेच लहान पक्ष आणि संघटना अस्तित्वात आहेत. त्यांचा प्रभाव राज्यव्यापी नसला तरी काही ठराविक पॉकेटमध्ये हे पक्ष नक्कीच प्रभावीपणे कार्य करीत आहेत. अशा सर्व तेरा लहान पक्षांनी मिळून एक वेगळी संघटना प्रागतिक आघाडी (Progresive front) म्हणून स्थापन केली आहे. प्रगतीशील विचाराची ही संघटना जातीयवादी विचार विरोधी आणि संविधान रक्षक संघटना म्हणूनच ओळखली जाईल. ही संघटना यापुढे एकदिलाने एकविचाराने काम करेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचे राज्य या संकल्पनेवर विश्वास ठेवूनच आम्ही सारे काम करणार आहोत. या फ्रंटचे प्रमुख म्हणून मी स्वत: (शेकाप), कॉ. अशोक ढवळे (सीपीएम) सर्वश्री. हितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी), राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना), कॉ.भालचंद्र कांगो (सीपीआय), श्री. अबू आझमी (समाजवादी) हे असतील. प्रागतिक फ्रंटमध्ये शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष व शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, जनता दल सेक्युलर महाराष्ट्र, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, बहुजन विकास आघाडी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, भाकपा लिब्रेशन पार्टी, रिपाई सेक्युलर पार्टी, श्रमिक मुक्ती दल हे पक्ष सामील असतील. प्रागतिक फ्रंट हा महाराष्ट्र विकास आघाडीचाच (मविआ) एक भाग असेल. आणि येत्या सर्व निवडणुकांसाठी आम्ही, भाजपाविरोधातील राष्ट्रीय पातळीवरील 27 पक्षांची स्थापन झालेली प्रागतिक विचाराची खछऊखअ आघाडी मजबूत व एकसंघ करण्यात आमचा सक्रीय सहभाग आणि मविआसोबतच असणार आहोत.
प्रश्न : आता शेवटी, शेतकरी कामगार पक्षाच्या भवितव्याबद्दल काय सांगाल?
उत्तर: मी काही ज्योतिषी नाही. पण एक सांगतो, जोपर्यंत विषम समाज व्यवस्था आहे, तोपर्यंत वर्ग संघर्ष अटळ आहे. आणि, असा संघर्ष फक्त शेतकरी कामगार पक्षच करू शकतो, हे ऐतिहासिक सत्य आहे. जोपर्यंत शेतकरी, कष्टकरी आहे आणि त्याच्यावर अन्याय होत आहे, तोपर्यंत आमचा हा लढा चालूच राहणार आहे. सध्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये तरुणांचाही फार मोठा सहभाग असतो. त्यामुळे येणारी पिढी नक्कीच हा प्रागतिक वारसा पुढे नेईल, हा मला विश्वास वाटतो.
लाल बावटा हा नुसता झेंडा नाही, ते एक व्रत आहे. लाल बावटा आमूलाग्र लोकशाही क्रांतीचे प्रतिक आहे. अन्यायविरोधी उसळूण बंड करण्याची, कणखर भूमिका घेण्याची ताकद लाल बावट्यामध्ये आहे. प्रस्थापितांविरोधी प्रखर भूमिका मांडण्याची, अंगिकारण्याची ऊर्मी, लाल बावट्यामध्ये आहे. लाल बावट्याची ताकद प्रस्थापित राजसत्ता उलथवून टाकण्याएवढी आहे.
लाल बावटेकी जय! लाल सलाम!!
मुलाखत – आनंद कोळगांवकर