प्रागतिक पक्ष भाजपच्या विरोधातच – आ. जयंत पाटील

महाविकास आघाडीने विश्‍वासात घेण्याचेही आवाहन
। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यातील प्रागतिक पक्ष कोणत्याही परिस्थितीत जातीयवादी भाजपसोबत जाणार नाहीत, मात्र महाविकास आघाडीने गृहीत न धरता या सर्व पक्षांना विश्‍वाासात घ्यावे, असे आवाहन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी गुरुवारी मुंबई येथे केले.

राज्यातील प्रागतिक पक्षांच्या आघाडीतर्फे राज्यभरातील प्रमुख पदाधिकार्‍यांची संवाद सभा चर्चगेट येथील इंडियन मर्चंट चेंबरच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ.डॉ. अशोक ढवळे, कॉ.उदय नारकर, जनवादी महिला सभेच्या कॉ.मरियम ढवळे, समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रकाश रेड्डी, जनता दलाचे प्रभारी अध्यक्ष नाथा शेवाळे, महासचिव प्रताप होगाडे, शेकापचे प्रा. एस. व्ही. जाधव, भारतीय रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अ‍ॅड (डॉ). सुरेश माने, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. किशोर ढमाले, आरपीआय सेक्युलरचे पँथर श्याम गायकवाड, सीपीआय एमएल लिबरेशनचे कॉ.अजित पाटील, लाल निशाण पक्षाचे कॉ. विजय कुलकर्णी आदी नेते उपस्थित होते.

आताच्या भाजपपेक्षा अधिक मोठे यश 1971 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी मिळवले होते. परंतु पाच वर्षात देशात सत्ता परिवर्तन झाले होते; याची आठवण करून देत, दिवा मोठा होतो तेव्हा तो मालवायला आलेला असतो, याचे भान भाजपने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवावे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

सपा नेते आ.अबू आझमी यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा आणि एकटे पाडण्याचा प्रयत्न संघ परिवाराकडून होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

संघ परिवाराने निर्माण केलेल्या धार्मिक उन्मादाला तोंड देण्यासाठी धर्म प्रबोधनाची चळवळ सुरू करण्याची आवश्यकता किशोर ढमाले यांनी व्यक्त केली. कोकणच्या विकासासाठी आणि रोजगारासाठी रिफायनरीची गरज असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. मात्र प्रगत तंत्रज्ञानामुळे कमाल 950 उच्च शिक्षितांनाच येथे नोकर्‍या मिळतील, ज्यात स्थानिक कुणीच नसतील! प्रदुषणाला मात्र कायमचे तोंड द्यावे लागेल, असे सीपीआयएमएल (लिबरेशन)चे कॉ.अजित पाटील म्हणाले. यावेळी बारसू परिसरात सुरू असलेल्या रिफायनरी विरोधी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. शेकापचे राजेंद्र कोरडे यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.

आंदोलनाचे मोहोळ
प्रागतिक पक्षांचा मुख्य शत्रू वा विरोधक भाजपच आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्‍नच येत नाही. राज्यातील शेतकर्‍यांना मोफत वीज मिळावी, ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी, शेतीला उद्योग म्हणून दर्जा मिळावा, शेतीच्या विम्याचा काळाबाजार आधी प्रश्‍नांवर पुढील काळात आंदोलनाचे मोहोळ राज्यभरात उठविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. येत्या काळात राज्यात विभागवार नेत्यांच्या बैठका व कार्यकर्त्यांचे मेळावे व शेवटी मुंबईत विराट मोर्चा असा कार्यक्रमही त्यांनी जाहीर केला.

सरकार आणि व्यवस्थापनात भ्रष्टाचार – प्रताप होगाडे
सरकार आणि व्यवस्थापनातील भ्रष्टाचारामुळे राज्यातील जनतेला देशातील सर्वात महागडी वीज खरेदी करावी लागत असल्याचा आरोप केला. सरकारने ठरवले तर शेतकर्‍यांना मोफत वीज देणे शक्य आहे.

भाजपची उलटी गिनती सुरू झाली असून 2024 मध्ये देशात परिवर्तन अटळ आहे.त्यासाठी राज्यातील प्रागतिक पक्षांनी संघटित राहून आपली ताकद वाढविली पाहिजे.

डॉ. अशोक ढवळे,माकपचे नेते
Exit mobile version