नऊ ऑगस्ट रोजी हुतात्मा दिनी राज्यभर शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
खेड। अजित जाधव ।
शासनाने शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या व शिक्षण धोरणासंदर्भात अतिशय धरसोडीची भूमिका स्वीकारली आहे. याबाबत शिक्षक भारतीने अनेकवार अर्ज विनंत्या करून सुद्धा योग्य प्रतिसाद दिला नाही. शासनाकडून दखल न घेता दप्तर दिरंगाईचे धोरण सुरु ठेवले.
या सर्वाच्या निषेधार्थ शिक्षक भारती संघटनेने शिक्षक आमदार कपिल पाटील व राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे सरांच्या नेतृत्वाखाली राज्यभर नऊ ऑगस्ट रोजी या हुतात्मा दिनी सर्व जिल्ह्यांच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील यांनी दिली.
याबाबत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य शासनाने शाळांना वेतन अनुदान, शालार्थ प्रणाली मधला बोजवारा आणि त्याबाबतची प्रचंड दिरंगाई, शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेमध्ये होणारा विलंब व संशयास्पद दिरंगाई , बीडीएस प्रणाली सुमारे सहा महिने बंद ठेवून निवृत्त व इतर शिक्षकांना देय आर्थिक लाभापासून दीर्घकाळ वंचित ठेवणे, शिक्षक भरतीमध्ये प्रचंड दिरंगाई यासह अनेक मागण्यांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही योग्य निर्णय वेळेत झालेले नाहीत म्हणून या व इतर मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधून घेत आवश्यक निर्णय होण्यासाठी सोमवारी नऊ ऑगस्ट रोजी राज्यभर माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्यानुसार शिक्षक भारती या राज्यस्तरीय शिक्षक संघटनेच्या निर्णयानुसार येत्या सोमवारी दि ०९ ऑगस्ट रोजी दुपारी १:०० ते ४:०० या वेळेत विविध मागण्यांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने शासनाने लक्ष घालावे यासाठी लाक्षणिक आंदोलन जाहीर केले आहे.