। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अडीच वर्षांपासून रखडलेल्या आणि शेतकरी कामगार पक्षाच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागलेल्या अलिबाग रोहा रस्त्याचे काम पुन्हा सुरु होणार असल्याचे कळताच कसलेही योगदान नसताना या रस्त्याच्या कामासाठी आधी भाजपामध्ये काही दिवसांपुर्वी आलेल्या दिलीप भोईर आणि पाठोपाठ दुसर्या दिवशी शिंदे गटाने नारळ फोडत श्रेयवादाची लढाई सुरु केली आहे. एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या शिंदे गट आणि भाजपात अलिबागमध्ये रंगलेल्या कलगी तुर्याने जनतेचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले आहे.
शेकापक्षाच्या रास्ता रोका आंदोलनामुळे सुरु झालेले अलिबाग-रामराज-रोहा रस्त्याचे काम रखडल्याने शेतकरी कामगार पक्षाने वारंवार आक्रमक भुमिका घेतली. शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सुरुवातीला रास्ता रोको करीत काम सुरु करण्यास भाग पाडले. त्यानंतर रखडलेल्या कामासाठी माजी आमदार पंडीत पाटील, चित्रलेखा पाटील आणि तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर वारंवार हल्लाबोल केला. तातडीने हे रखडलेले काम सुरु करण्यात आले नाही तर शेकापक्षाच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला होता. त्यानंतर या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र ठेकेदार पळून गेल्यानंतर त्याचा जाब विचारत शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनीच सार्वजनिक बांधकाम अधिकार्यांना खडसावले होते. त्यावेळी ना शिंंदे गटाला आठवण झाली ना भाजपाच्या नेत्यांना जाब विचारासा वाटला. मात्र त्या रस्त्याचे काम सुरु होणार असल्याचे लक्षात येताच काल परवा भाजपाची झुल अंगावर घेतलेल्या दिलीप भोईर यांनी नारळ फोडीत मोठया थाटात कामाचा शुभारंभ केला. या प्रकारामुळे संपूर्ण जनतेत आश्चर्य व्यक्त करीत दिलीप भोईर यांचा या रस्त्याशी काय संबंध अशी विचारणा होत होती. त्यानंतर जाग आलेल्या शिंदे गटाने माजी जिप सदस्या मानसी म्हात्रे यांनी दुसर्या दिवशी नारळ फोडून आणखी तारे तोडण्याचे काम केले. यावेळी त्यांनी दिलीप भोईर यांचा चांगलाच समाचार घेत चौफेर टिका केली. भोईर यांच्यावर टिका करताना त्यांनी खोटारडेपणा करणार्या दिलीप भोईर यांच्या चोराटी काम करणार्यांना धडा शिकविणार असल्याचा दम देखील दिला आहे. तसेच हिरोगीरी करीत श्रेय लाटण्याचा प्रयत्नावर कडाडून हल्ला दळवी यांनी चढवला. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेल्या या शिंदे गट आणि भाजपामध्ये न केलेल्या कामाचे श्रेयवादासाठी रंगलेल्या कलगी तुर्याने जनतेचे चांगलेच मनोरंजन होत आहे.
अलिबाग रामराज रोहा या अनेक वर्षे रखडलेल्या रस्त्याच्या कामाला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि तत्कालिन आमदार पंडित पाटील यांनी मंजुरी मिळवून आणली. मात्र राजकारण करीत सदर रस्त्याच्या कामाला तत्कालिन भाजपा सेना युती सरकारने सुरुवात करुन दिली नाही. शेवटी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी युवक संघटनेने रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाच्या तडाख्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने सदर रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्वासन मुख्य अभियंता सुखदेवे यांनी आंदोलन स्थळी येऊन दिले होते. त्यानुसार काही दिवसातच सदर रस्त्याचे काम सुरु करण्यात आले. त्यावेळी कसलाही संबंध नसलेल्या काही उपसुंभांनी येऊन श्रेय लाटण्याचा केविलवाणे प्रयत्न देखील केले.