मंंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन
आगमी सर्वच निवडणुका स्वबळावर जिंकण्याचा व्यक्त केला विश्वास
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यातील विविध ठिकाणी शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असून, दापोली तसेच मंडणगड या ठिकाणी आयोजित मेळाव्यात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सभेला संबोधित केले आहे. याप्रसंगी, शिवसेनेच्या बालेकिल्ल्या आघाडीसाठी जागा नसल्याचे प्रतिपादन करण्यासोबतच, आगामी काळातील सर्वच निवडणुका स्वबळावर जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
दापोली येथील राधाकृष्ण मंदिर सभागृहातील मेळाव्यात सामंत म्हणाले की, पक्षाचे सर्व निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतात. त्यामुळे त्यांनी निवडणुकीसंदर्भात घेतलेले निर्णय आपल्याला मान्य करायला हवेत. ज्या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व आहे, ती जागा दुसर्या कोणाला देण्याची आवश्यकता नाही. पण शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आघाडीसाठी जागा सोडण्याचा प्रश्च उद्भवत नाही. आघाडी करायची असेल, तर हा सर्व निर्णय आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सोडू. तोपर्यंत प्रामाणिकपणे शिवसेनेचे काम करूया, अशी सूचना उदय सामंत यांनी केली आहे.
तर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची सत्ता असली तरीही प्रत्येक पक्षाला पक्षवाढीचे कोणतेही बंधन नाही. शिवसेना हा पक्ष सर्वसामान्याच्या विकासासाठी सदैव बांधील असून आगामी सर्वच निवडणूका शिवसेना स्वबळावर जिंकेल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंडणगड येथील कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला.
याशिवाय, शिवसेना सोडून गेलेल्यांना लवकरच पश्चात्ताप, भ्रमनिरास झाला तरी त्यांना कोणत्याही परीस्थितीत पक्षात पुन्हा स्थान नसल्याचे सामंत यांनी म्हटले आहे. तर, भाजपबद्दल बोलताना ते म्हणाले, येत्या निवडणुकीत त्यांना राज्यातील जनता मातीमोल केल्याशिवाय राहणार नसल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.
याप्रसंगी, ज्यांना पक्षाने मोठे केले ते दुसरीकडे गेल्यावर आपण त्यांना विसरले पाहिजे. त्यांचे नाव घ्यायचे टाळले पाहिजे, असा टोला उदय सामंत यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले संदीप राजपुरे यांना लगावला.
मंडणगड तालुक्यातील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, कृषी सभापती रेश्मा झगडे उपस्थित होते.