शिवसेना शिंदे गट हा विकृतीने झपाटलेला; सुषमा अंधारे यांचा घनाघात

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आलेला शिंदे गट हा विकृतीने झपाटलेला आहे. स्वतःच्या स्वार्थापोटी त्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली दरबारी गहाण टाकला आहे. महाराष्ट्रातील एकापाठोपाठ एक प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर यांना एक भ्र शब्दही काढता आला नाही, असा घनाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवार (दि.26) विष्णुदास भावे नाट्यगृह नवी मुंबई येथील महिला मेळाव्यात केला.

महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवार (दि.26) वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात महिला मेळाव्याची आयोजन करण्यात आले होते. सौ. रश्मी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. राज्यात सर्वात जास्त क्राईम रेट हा ठाणे आणि कल्याण मध्ये आहे. या दोन्ही भागांवर मुख्यमंत्र्यांचा प्रभाव आहे. येथे विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना हैराण केले जात आहे. महाराष्ट्रात फार्मसीचे कॉलेज मोठ्या प्रमाणात आहेत दरवर्षी या कॉलेजमधून एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी बाहेर पडतात. या विद्यार्थ्यांना राज्यातच रोजगार मिळावा यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मल्टी ट्रक प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणला होता. मात्र विद्यमान सरकारने हा प्रोजेक्ट नंतर अहमदाबादच्या घशात घातला. आपले वाटोळे करून गुजरातचे भले करणारे धोरण हे प्रकृती नसून विकृती आहे. ही विकृती ठेचून काढण्यासाठी लोकसभा निवडणुकीत राजन विचारे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहनही सुषमा अंधारे यांनी यावेळी केले. सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या भाजपचे उमेदवार पियुष गोयल हे मच्छी मार्केटमधून जात असताना त्यांनी नाकाला रुमाल लावला होता. ही बातमी नेहा पुरव यांनी दिली. बातमी देणे हा पत्रकारांचा अधिकार आहे. मात्र, ही बातमी भाजपवाल्यांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे त्यांनी नेहा पुरव यांना थेट त्यांच्या घरी जाऊन धमकी दिली. या धमकीचा महाविकास आघाडी जाहीर निषेध करीत आहोत,

या मेळाव्याला शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण, शिवसेना समन्वयक शिल्पा सरपोतदार, रेखा खोपकर, नंदिनी विचारे, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा पूनम पाटील, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सलुजा सुतार, विनया मढवी, आपच्या धनवंती बच्चन, कोमल वास्कर, तनुजा मढवी, वैशाली घोरपडे, स्नेहल सावंत, सुलोचना शिवानंद, विजया सुर्यवंशी, दर्शना कौशिक, हेमांगी सोनावणे, पूनम आगवणे आदी उपस्थित होते.

सत्तेत येण्यापूर्वी मोदी यांनी गॅस सिलेंडरचे दर साडेतीनशे रुपये करू अशा आश्वासन दिले होते. मात्र, आता सिलेंडर बाराशे रुपयांच्या पुढे गेला आहे. जीवनावश्यक सर्वच वस्तूंच्या किमती महागले आहेत. गोडेतेल दोनशे रुपये किलो झाले आहे. या महागाईचा सर्वाधिक फटका हा गृहिणींना बसत आहे. त्यामुळे मोदी सरकारला घालवण्यासाठी आता पदर खोचून कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी उपस्थित महिलांना केले.

Exit mobile version