धाराशिवमध्ये धक्कादायक घटना; मतदान केंद्राजवळ चाकू हल्ला

राजकीय वादाचं पर्यवसन हत्येमध्ये

| धाराशिव | वृत्तसंस्था |

धाराशिव राज्याच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला गालबोट लागलं असून धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळच झालेल्या चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी या ठिकाणी ही हत्येची घटना घडली आहे. राजकीय वादातून ही हत्या झाल्याची माहिती असून या ठिकाणचे वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन गटांतील वादाचं पर्यवसन चाकू हल्ल्यात झालं आणि त्यात एकाचा मृत्यू झााल. चाकू हल्ला करणारा हल्लेखोर फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. तर या हल्ल्यात इतर तीन जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तालुका रुग्णालयात समाधान पाटीलचा मृतदेह ठेवण्यात आला असून त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे भेट देणार असल्याची माहिती आहे.

मतदार आणण्यावरून वाद आणि हत्या
मतदान केंद्रावर मतदान आणण्यावरून हा वाद झाला आणि त्यानंतर त्याचं पर्यवसन मोठ्या भांडणात झालं. त्यातून एका गटाने दुसऱ्या गटावर चाकू हल्ला केला. समाधान पाटील असं मृत तरुणाचं नाव आहे. तर ज्याने चाकू हल्ला केला त्या आरोपीचं नाव गौरव अप्पा नाईकनवरे असं आहे.
Exit mobile version