धुळे-सोलापूर महामार्गावरील गढी पुलावर अपघात
। बीड । प्रतिनिधी ।
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे गाडीचा अपघात झाला त्यावेळी सर्वजण वाचले, कोणलाही कसलीही इजा झाली नाही. मात्र, त्यानंतर दुसऱ्यांदा झालेल्या अपघतामध्ये एकाच वेळी सहा जणांचा मृत्यू झाला.
गेवराई शहरानजीक असणाऱ्या गढी पुलावरुन एका एसयूव्ही कारमधून सहा जण प्रवास करत होते. रात्रीच्या वेळी रस्ता रिकामा असल्याने गाडी भरधाव वेगाने जात होती. मात्र, अचानक कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हायडरला जाऊन धडकली. यावेळी कारमधील काहींना किरकोळ मार बसला. मात्र, कारचे काही प्रमाणात नुकसान झाले. अशातच डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले. याच दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने सहा जणांना जबरदस्त धडक दिली आणि यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ट्रकने दिलेली धडक इतकी भीषण होती की, सहाजण दूरवर फेकले गेले. सहा जणांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते. अपघात झाल्यावर संबंधित ट्रक चालकाने तिथून पळ काढला. हा अपघात मध्यरात्री झाला असून बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.