….. म्हणून मी नारायण राणेंना मानतो – खा. संजय राऊत

। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा ओपन चॅलेंज दिलं आहे. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जा असं आव्हान राऊतांनी शिंदे गटाला दिलं आहे. हे आव्हान देताना राऊत यांनी नारायण राणे यांचं मात्र कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. राऊत यांनी म्हटलं की, जे फुटले त्यांची शिवसेना असू शकत नाही. तुमच्यात धमक आहे तर आमदारकीचे राजीनामे द्या. मी नारायण राणेंना मानतो. त्यांचा गट लहान होता. पण त्यांनी राजीनामे दिले. ते निवडणुकीला सामोरे गेले. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदेंचे 22 लोक फुटले त्यांनी राजीनामा दिला. निवडणुकीला सामोरे गेले, जिंकून आले. त्यांनी सरकार बनवलं. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही राजीनामे द्यायचे, असं आव्हान राऊत यांनी दिलं आहे.

तसंच जे फुटले त्यांची शिवसेना असू शकत नाही असंही राऊतांनी म्हटलं आहे. तुमच्याकडे 54 आमदार असून द्या, राजीनामे द्यायचे आणि आपापल्या मतदारसंघात जाऊन निवडणुका लढवण्याची हिंमत दाखवा. हे माझं खुलं आव्हान आहे. तुम्ही गुवाहाटीत बसून आम्हाला शिवसेनेची, हिंदुत्वाची अक्कल शिकवणार, अशा शब्दात राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

Exit mobile version