वर्धापनदिनी शेकापची सामाजिक बांधिलकी

पनवेलमध्ये रुग्णांना फळांचे वाटप
| पनवेल | प्रतिनिधी |

सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणात राजकीय पुढारी डोंगर-झाडी-दर्‍या पाहात स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय पर्यटन करत आहेत. तसेच पर्यटन करता-करता पक्षांतर करूनसुद्धा प्रत्येक पक्षातील लाभाची पदे उपभोगत आहेत. परंतु, या नव्याने रुजू होत असलेल्या राजकीय संस्कृतीला छेद देत शेतकरी कामगार पक्षाने आजही आपला लालबावटा डौलाने फडकत ठेवलेला आहे. महाराष्ट्राचा विकास हे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या ध्येयाने शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते काम करत आहेत, याची आज पुन्हा एकदा पनवेलकरांना प्रचिती आली.

वर्धापनदिनानिमित्त पनवेल शहरातून हजारो कार्यकर्ते जाताना सामाजिक बांधिलकीतून पनवेल शहरातील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय, गुणे हॉस्पिटल, नीलाताई पटवर्धन रुग्णालय या ठिकाणी शेकाप नेते आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पुरोगामी युवक संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब देशमुख, शेकाप नेते नारायण घरत, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पनवेल महानगरपालिका, शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी, जिल्हा चिटणीस गणेश कडू यांच्यासोबत इतर नेते आणि कार्यकर्ते यांनी सर्व रुग्णांना फळ वाटप केले.

महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती आपण सर्व पाहात आहात. अशाप्रसंगी शेकापच्या वर्धापन दिनाला 75 वर्षे होत आहेत. यानिमित्ताने शेकापचा इतिहास खूप मोठा आहे. त्यानुसारच याची ध्येय धोरणे मनाशी बाळगून भविष्यात सुदृढ आणि समृद्ध पनवेल करण्यास आम्ही शेकापच्या लालबावट्याखाली अजून जोमाने काम करू, असे प्रतिपादन शेकाप नेते आणि विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केले.

Exit mobile version