पोलादपूर येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव
| पोलादपूर | प्रतिनिधी |
व्यवसायावरून समाजामध्ये व्यवसाय व्यवस्थित न चालविल्यास नुसतीच जात शिल्लक राहते. त्यामुळे सुवर्णकार आणि कारागीर संघटनेने सोनार समाजाचे नेतृत्व करून विविध घटकांना प्रोत्साहित करण्यासोबतच स्वत:चे व्यवसायदेखील सचोटीने चालविण्याची गरज आहे. विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमामुळे समाज घडणार आहे. कारण पुढच्या पिढीला प्रोत्साहित करण्यानेच समाज घडत असतो, असे मत ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी येथील सुवर्णकार व कारागिर संघटनेतर्फे ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमप्रसंगी मांडले.
याप्रसंगी व्यासपीठावर सेवानिवृत्त कॅनरा बँक मॅनेजर प्रभाकर पालकर, माजी उपसरपंच मंगेश नगरकर, दापोली कृषी विद्यापिठाचे सेवानिवृत्त अधिकारी सुर्यकांत नगरकर, सामाजिक कार्यकर्ते विजय पालकर, रवींद्र नगरकर तसेच सुवर्णकार व कारागिर संघटनेचे अध्यक्ष संजय वि.पालकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन तसेच संतशिरोमणी नरहरी सोनार महाराज तसेच छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आर्किटेक्चरची पदवी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण सुप्रीत संदीप पालकर तसेच एसएससी परिक्षेत उत्तीर्ण झालेले अनुराग शेखर पालकर, प्राजक्ता दीपक पालकर, कोमल किशोर पालकर, आदिती विलास नगरकर यांचा विविध मान्यवरांच्याहस्ते प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.